एसबीएल कंपनी स्फोट ! आणखी दोघींचा मृत्यू; २२ वर पोहोचली मृत कामगारांची संख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:34 IST2026-03-09T15:33:31+5:302026-03-09T15:34:28+5:30
Nagpur : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल कंपनी लिमिटेड'मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. उपचाराखाली असलेल्या दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला.

SBL company explosion! Two more die; death toll reaches 22
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल कंपनी लिमिटेड'मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. उपचाराखाली असलेल्या दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आता २२वर पोहोचली असून, सध्याच्या स्थितीत ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे १४ महिला उपचार घेत असून, दोन महिला व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
आम्रपाली काळसर्पे (वय ३६, रा. राऊळगाव, ता. काटोल) यांचा उपचारादरम्यान ७ मार्च रोजी रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्या ५५ टक्के जळाल्या होत्या. त्या पहिल्या दिवसापासून व्हेंटिलेटरवर होत्या, तर रोशनी सूर्यकांत उमाठे (वय ३२, रा. दुधाळा) यांचा ८ मार्च रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्या ७५ टक्के जळाल्या होत्या. त्यांच्या हाताला गंभीर फ्रैक्चर होते, पायांवर शस्त्रक्रिया करून 'एक्सटर्नल फिक्सेशन' करण्यात आले होते.
सध्या गंभीर रुग्णांमध्ये सुजाता विनायक रक्षीत (३५) व सीमा विजय धुर्वे (२७) दोन्ही ७० टक्के, ज्योती शामू धुर्वे (२१ वर्षे) ६५ टक्के जळाल्या असून, या तिन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते.
अनेकींची मृत्यूशी झुंज सुरूच
सध्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या दुर्गा मनोज घाटगे ६० टक्के, उषा बालाजी रेवतकर ५० टक्के, मयुरी धुर्वे ४५ टक्के, मनीषा धुर्वे ४५ टक्के, काजल कोरती व रितू सलाम प्रत्येकी ४० टक्के, कविता उईके ३५ टक्के, सुनीता उईके ३० टक्के आणि वैशाली धुर्वे १५ टक्के जळाल्या असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अल्प जखमींमध्ये वैशाली सटई आणि रोशनी मसराम असून, दोन्ही ५ टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.