'सीबीएसई' गणिताच्या पेपरमध्ये 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्न; १२ वीच्या परीक्षेदरम्यान गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:46 IST2026-03-10T14:46:02+5:302026-03-10T14:46:48+5:30
Nagpur : केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या १२ वीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी झालेल्या गणिताच्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेत १२ गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे आल्याचे सांगण्यात येत आहे.

'Out of syllabus' questions in CBSE maths paper; Confusion during class 12th exams
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या १२ वीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी झालेल्या गणिताच्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेत १२ गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी सीबीएसईला ई-मेलद्वारे तक्रारही केली आहे.
विद्यार्थी व पालकांनी सांगितले की, १२वीच्या अप्लाइड मॅथ्स विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे अवलोकन केल्यानंतर अभ्यासक्रम आणि प्रश्नांमध्ये दिलेल्या आकडेवारीशी संबंधित काही विसंगती आढळून आल्या. काही प्रश्न तांत्रिकदृष्ट्या अभ्यासक्रमाशी सुसंगत नसल्याचेही दिसून आले. प्रश्न क्रमांक १९ हा अभ्यासक्रमाबाहेरील आहे. या प्रश्नात इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा वापर करण्यात आला असून, तो अप्लाइड मॅथेमॅटिक्स (२४१) या विषयाच्या निर्धारित अभ्यासक्रमात समाविष्ट नाही. प्रश्न क्रमांक 39 देखील अभ्यासक्रमाबाहेरील आहे. हा प्रश्न फायनान्शियल मॅथेमॅटिक्समधील 'रिटर्न' या विषयाशी संबंधित असून, सध्याच्या अभ्यासक्रमात तो समाविष्ट नाही.
प्रश्न क्रमांक ३७ (ii) मध्ये 'सेल्समधील एव्हरेज चेंज'ची गणना विचारण्यात आली आहे. मात्र हा भाग चालू शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तसेच प्रश्न क्रमांक ३४ (बी) मध्ये अपुरी माहिती देण्यात आली आहे. हा प्रश्न 'पॉयसन डिस्ट्रीब्युशन'शी संबंधित आहे. मात्र तो सोडविण्यासाठी आवश्यक असलेला घातांकीय मान (e^-) प्रश्नपत्रिकेत दिलेला नव्हता.
विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांनी परीक्षेची चांगली तयारी करूनच केंद्रावर हजेरी लावली होती. मात्र प्रश्नपत्रिकेत अनेक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे आल्याने मोठी अडचण निर्माण झाली. काही विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, पण शाळेत तो भाग शिकविलाच नसल्याने प्रश्न सोडविणे कठीण झाले. यामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेला आणि इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले.
वेळ वाया गेल्याने अनेकांना प्रश्न सोडवता आले नाहीत
८० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत १२ गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याने प्रत्यक्षात केवळ ६८ गुणांचेच प्रश्न विद्यार्थ्यांसाठी राहिले. त्यातही वेळ वाया गेल्याने अनेक प्रश्न सोडवता आले नाहीत. याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर निश्चितच परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.