सोन्याची इयररिंग शोधण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ‘ऑपरेशन अमानत’
By नरेश डोंगरे | Updated: April 11, 2026 19:56 IST2026-04-11T19:49:38+5:302026-04-11T19:56:51+5:30
Nagpur : रेल्वे प्रवासात हरवलेल्या मौल्यवान चीज वस्तू परत मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. मात्र प्रवाशांनी तातडीने हालचाल केल्यास आणि रेल्वे सुरक्षा दलाने तत्पर प्रतिसाद दिल्यास मौल्यवान चीज वस्तू परत मिळू शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

'Operation Amanat' on Vande Bharat Express to find gold earrings
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :रेल्वे प्रवासात हरवलेल्या मौल्यवान चीज वस्तू परत मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. मात्र प्रवाशांनी तातडीने हालचाल केल्यास आणि रेल्वे सुरक्षा दलाने तत्पर प्रतिसाद दिल्यास मौल्यवान चीज वस्तू परत मिळू शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची सोन्याची इयररिंग पडल्याचे कळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत कार्यरत रेल्वे सुरक्षा दलाने तत्परतेने शोधाशोध केली आणि गाडीतून ३६ हजार रुपयांची ही इयररिंग शोधली. ही घटना ट्रेन नंबर २०८२६ वंदे भारत एक्स्प्रेस मधील कोच नंबर ई १ मध्ये ८ एप्रिलला घडली.
या कोचमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची सोन्याची इयररिंग (बाली) हरवल्याची तक्रार रेलमदद पोर्टलवर नोंदवण्यात आली. तक्रार मिळताच आरपीएफ नागपूरच्या अनुरक्षण पथकाने तातडीने हालचाल करत ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत शोधमोहीम सुरू केली. विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पथकातील आरक्षक व्ही. पी. सिंह यांनी तत्परतेने संबंधित ई-१ डब्यात तपासणी करत हरवलेली सोन्याची बाली शोधून काढली.
त्यानंतर नागपूर सुरक्षा नियंत्रण कक्ष आणि गोंदिया आरपीएफ पोस्टच्या माध्यमातून संबंधित प्रवाशाला याची माहिती देण्यात आली. दरम्यान, ९ एप्रिल रोजी गाडी क्रमांक २२६४७ तिरुअनंतपुरम एक्स्प्रेसद्वारे ही बाली परत आणून गोंदिया आरपीएफ पोस्टकडे सुपूर्द करण्यात आली. तक्रारदार मनोज जेठानंद मनुजा (वय ४४, रा. हरिकाशी नगर, गोंदिया) हे तेथे उपस्थित झाल्यानंतर आवश्यक पडताळणी करून त्यांना बाली परत देण्यात आली. या संपूर्ण कारवाईबद्दल संबंधित प्रवाशाने आरपीएफच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
सतर्क रहा, तत्पर रहा : प्रवाशांना आवाहन
प्रवासादरम्यान आपल्या सामानाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरपीएफने केले असून, कोणतीही अडचण आल्यास किंवा वस्तू हरवल्यास तत्काळ रेलमदद हेल्पलाइन १३९ किंवा जवळच्या रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.