जिल्हा बँक सुरू केल्याचा केवळ देखावा

By Admin | Updated: April 23, 2016 03:11 IST2016-04-23T03:11:24+5:302016-04-23T03:11:24+5:30

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू केल्याचा गवगवा राज्य सरकारतर्फे करण्यात आला.

Only the appearance of starting the district bank | जिल्हा बँक सुरू केल्याचा केवळ देखावा

जिल्हा बँक सुरू केल्याचा केवळ देखावा

अनिल देशमुख यांचा आरोप : कर्जासाठी टाकल्या जाचक अटी
नागपूर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू केल्याचा गवगवा राज्य सरकारतर्फे करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात जाचक अटी टाकून शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठी आता टाळाटाळ केली जात आहे. ही बँक सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा होणार नाही. सरकारने जाचक अटी टाकून आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
देशमुख यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करीत राज्य सरकारवर नेम साधला आहे. देशमुख यांनी म्हटले आहे की, आपण मंत्री असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत भांडून ३१९ कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. यानंतर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या. याच निवडणुकीच्या काळात प्रचाराचा मुदा करीत भाजपने सत्तेत येताच नागपूर जिल्हा बँक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्यावर यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा होती. मात्र, तब्बल दीड वर्ष लागले. आता ही बँक सुरू झाल्याने आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना मदत होईल असे वाटत होते. मात्र, कर्ज देण्यासाठी जाचक अटी टाकून शेतकऱ्यांना कर्ज घेण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.
ज्यांनी यापूर्वीच बँक डबघाईस असताना मदत व्हावी म्हणून कर्ज चुकते केले त्यांना यावर्षी कर्ज देण्यात येणार नाही. यामुळे कर्ज चुकवून शेतकऱ्यांनी गुन्हा केला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांच्यावर आता कर्ज आहे त्यांनी जर पूर्ण कर्ज भरले तर त्यांना नव्याने एक लाख रुपये कर्ज देण्यात येईल. एवढेच नव्हे तर कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रातही वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून कर्ज देण्यास सुरुवात केली असताना आतापर्यंत केवळ १५ लाख रुपयांच्या कर्जाचे तुटपुंजे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँक सुरू झाल्याने आपणास सुलभतेने कर्ज मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते.
परंतु ही बँक सुरू करून कर्ज न देता त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

थकीत कर्ज कसे भरणार?
सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाने एक रुपयाचीही मदत केलेली नाही. कापसाला योग्य भाव मिळाला नाही. संत्रा मातीमोल भावाने गेला. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्याकडे पुढील हंगामात पेरणीसाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत शेतकरी थकीत कर्ज कसे भरणार, यावर सरकारने विचार केलेला नाही अशी टीकाही देशमुख यांनी केली आहे.

Web Title: Only the appearance of starting the district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.