ना मेसेज आला, ना ओटीपी मागितला ! खात्यात पैसे आपोआप गायब; वयोवृद्ध ग्राहकांना करत आहेत लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:36 IST2026-03-31T18:35:38+5:302026-03-31T18:36:47+5:30
Nagpur : कुही तालुक्यातील मांढळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Neither message received, nor OTP requested! Money automatically disappears from account; They are targeting elderly customers
लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : कुही तालुक्यातील मांढळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः वयोवृद्ध ग्राहकांना लक्ष्य करण्यात आल्याची बाब समोर येत असून, एकाच विशिष्ट कालावधीत अनेक खात्यांमधून पैसे काढले गेल्याने सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक खात्यातून किमान १० ते ३० हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आल्याची माहिती आहे.
पीडित ग्राहकांमध्ये मांढळ येथील प्रभू मेश्राम, दत्तराज गोरबडे, वडेगाव येथील भागेरथा लुटे, तसेच माजरी येथील विनायक सेलोकर आणि गणेश नखाते यांचा समावेश आहे. मात्र, ही केवळ काही उदाहरणे असून आणखी अनेक ग्राहक या प्रकाराचे बळी ठरल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित ग्राहकांनी खाते तपासले असता रक्कम कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लंपास करण्यात आलेला रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, काहींना पैसे काढल्याचे कोणतेही संदेश किंवा ओटीपी प्राप्त न झाल्याने हा प्रकार अधिकच गंभीर ठरत आहे. याप्रकरणी दत्तराज गोरबडे यांनी सायबर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. या सर्व ग्राहकांनी आजवर बैंक सुविधा केंद्रांतून अंगठ्याच्या ठशावर आधारित व्यवहार केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बायोमेट्रिक माहितीचा गैरवापर झाल्याचा संशय अधिक गडद होत आहे. घटनेनंतर संतप्त ग्राहकांनी थेट बँकेत धाव घेत जाब विचारला. यावेळी शाखा व्यवस्थापक आशिष सिंह चंदेल यांनी ग्राहकांना धीर देत बँक प्रशासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत असल्याचे सांगितले. अंतर्गत तपास सुरू असून, तांत्रिक हँकिंगद्वारे व्यवहार झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच संबंधित रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सीएससी केंद्रांमधील गैरप्रकाराची शक्यता
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते लीलाधर धनविजय यांनी गंभीर शक्यता व्यक्त केली आहे. ग्राहक आधार अपडेट करण्यासाठी सीएससी केंद्रात जातात. तेथे ऑपरेटर ग्राहकाचे नऊ बोटांचे ठसे घेऊन स्वतःचा एक ठसा वापरून प्रक्रिया पूर्ण करतो नंतर त्याच ठशाच्या आधारे पैसे काढले जाऊ शकतात, असा आरोप त्यांनी केला.
सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ग्रामीण भागातील बँकिंग व्यवहारांवर या घटनेमुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकाच शाखेतील अनेक ग्राहकांना लक्ष्य करण्यात आल्याने ही एखाद्या संघटित सायबर टोळीची कारागिरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, कुही तालुक्यातील इतर बँकांच्या शाखांमध्ये कोणताही प्रकार घडलेला नसताना केवळ मांढळ शाखेतच ही घटना घडल्याने संशय अधिक बळावला आहे.
ग्राहकांना सावधनतेचे आवाहन
या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वेळोवेळी पासवर्ड बदलणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, तसेच बायोमेट्रिक माहिती देताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.