'नेहरू देशभक्त होते, मात्र मातृभूमीबाबत आपलेपणाची भावना नव्हती' भाजप नेते सुनील देवधर यांची नेहरूंवर टीका
By योगेश पांडे | Updated: February 5, 2026 20:40 IST2026-02-05T20:39:20+5:302026-02-05T20:40:31+5:30
Nagpur : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीनचा प्रदेश ताब्यात घेता आला नाही. जिथे काही पिकू शकत नाही ती भूमी काय कामाची असे त्यांचे विचार होते.

'Nehru was a patriot, but he had no sense of belonging towards the motherland', BJP leader Sunil Deodhar criticizes Nehru
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीनचा प्रदेश ताब्यात घेता आला नाही. जिथे काही पिकू शकत नाही ती भूमी काय कामाची असे त्यांचे विचार होते. नेहरू निश्चितच देशभक्त होते. मात्र पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असल्यामुळे त्यांच्यात मातृभूमीबाबत आपलेपणाची अजिबात भावना नव्हती, असे प्रतिपादन भाजपचे नेते सुनील देवधर यांनी केले. नागपुरात राम नगर येथे श्री शक्तिपीठ फाउंडेशन द्वारा आयोजित श्री दास नवमी उत्सवात त्यांचे ‘ संघ आहे म्हणून ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्याकडे शाश्वत स्वातंत्र्य मिळविण्याचा मार्ग होता. संघाच्या पहिल्या शाखेपासून सर्व स्वयंसेवक देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपापल्या परिने प्रयत्न करत होते. मात्र तरीदेखील राजकीय स्वार्थातून काही लोक संघाने स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान दिले असा सवाल करतात. आम्ही कधीही महात्मा गांधींच्या मार्गावर प्रश्न उपस्थित केले नाही. मग संघाच्या देशाबाबतच्या समर्पणावर प्रश्न उपस्थित करण्याचे कारण काय असा सवाल देवधर यांनी केला. जर देशात संघ नसता तर १९४७ नंतरदेखील अनेक फाळण्या झाल्या असत्या. संघाने ध्येयविहीन व आत्मविस्मृत हिंदू व भारतीय समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. संघाने व्यक्तिनिर्माण करण्यावरच भर दिला, असे देवधर म्हणाले. संघाने देशातील अनेक समाजांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. विशेषत: ईशान्येकडील राज्यांमध्ये तर शून्यापासून सुरुवात करून तेथील लोकांमध्ये देशाबाबतची तळमळ व आत्मियता कायम ठेवली असेदेखील त्यांनी सांगितले.
नेहरूच म्हणाले होते, हिंदू कुटुंबात चुकीने जन्म
मोतीलाल नेहरू यांच्या नावासमोर एकदा हिंदू लिहीले होते, तेव्हा ते मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असे वक्तव्य केले होते. जवाहरलाल नेहरू हेदेखील हिंदू कुुटुंबात माझा चुकीने जन्म झाला असे म्हणायचे, असा दावा देवधर यांनी केला.