आघाडीबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट नाही : शरद पवार काय बोलतात त्याचे दोन-तीन अर्थ होतात
By कमलेश वानखेडे | Updated: June 14, 2025 16:39 IST2025-06-14T16:38:15+5:302025-06-14T16:39:06+5:30
Nagpur : महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा हब

NCP's stance on alliance is not clear: What Sharad Pawar says has two or three meanings
कमलेश वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थाा निवडणुकीत महाविकास आघाडी होईल की नाही, याबाबत आता काँग्रेस नेते शंका व्यक्त करू लागले आहेत. शरद पवार काय बोलतात त्याचे दोन-तीन अर्थ होतात. जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत काही बोलता येत नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत बोलणं उचित नाही, असे मत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. आघाडीबाबत स्थानिक स्तरावर नेत्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांनी घ्यावा असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे स्थानिक नेत्यांना ‘एकला चलो’साठी मुभाही दिली.
शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, महायुतीचे चित्रही स्पष्ट नाही. एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार हे महायुतीत आहेत. ते आता आघाडी करतील का, हे आता बोलता येत नाही. त्यामुळे कुणी चुकीचा अर्थ काढू नये, थोडा धीर धरावा.
महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा हब
बच्चू कडूंच्या आंदोलनाला महाविकास आघाडी म्हणून रोहित पवार स्वतः भेट द्यायला गेले होते. शरद पवार यांनीबी फोन केला होता आणि यापूर्वीच काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढेल त्यांना आमचा पाठिंबा असेल, म्हणून बच्चू कडूंच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा हब झालेल आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. गेल्या दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आले, त्यांना कुठलीही मदत सरकारने केली नाही, अशी टीका त्यांनी केली.
भाजपमध्ये दोन गट
महाराष्ट्र असो, देश असो की मुंबई भाजप प्रत्येक ठिकाणी दोन गट आहेत. ते बंद खोलीत एकमेकांना ठोसा ठासी करतात. आमच्याकडे जास्त लोकशाही आहे, आम्ही उघडपणे करतो. काँग्रेससह इतर पक्षातून घेतलेल्या लोकांना खिरापत दिली जात आहे. त्यामुळे जुन्या लोकांना वेदना आणि दुःख होत आहे, याचा हा परिणाम आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.