Nagpur: वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:50 IST2025-12-08T12:48:26+5:302025-12-08T12:50:55+5:30
Tiger Attack in Vidarbha: टायगर सफारी, वनपर्यटनासाठी वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या नादात आता हे वाघ ज्यांनी शेकडो, हजारो वर्षे जंगले जपली, वाढवली ते आदिवासी व शेतकऱ्यांच्याच नरडीचा घोट घेऊ लागले आहेत.

Nagpur: वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल
नागपूर : वाघांची संख्या वाढली. त्यांना जंगल अपुरे पडू लागले. बिबट्यासारखे मार्जार कुळातले प्राणी मानवी वस्तीत शिरू लागले. नागरी भाषेत मानव-वन्यजीव संघर्ष की काय तो उभा राहिला. समाजातल्या शहाण्या माणसांनी वर्णन केलेल्या या नव्या समस्येची दुसरी बाजू ही आहे की, टायगर सफारी, वनपर्यटनासाठी वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या नादात आता हे वाघ ज्यांनी शेकडो, हजारो वर्षे जंगले जपली, वाढवली ते आदिवासी व शेतकऱ्यांच्याच नरडीचा घोट घेऊ लागले आहेत. विधिमंडळाच्या गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनापासून यंदाच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत विदर्भात तब्बल ६९ शेतकरी, आदिवासी स्त्री-पुरुषांचे बळी गेले असून प्रामुख्याने वाघांनी ५७ व १२ बळी बिबट्यांनी घेतले आहेत. किड्यामुंग्यांचे आयुष्य वाट्याला आलेली विदर्भातील दुबळी माणसे वाघांना खाऊ घातली जात आहेत.
याशिवाय रानटी हत्ती, रानडुक्कर व अस्वलांच्या मिळून सहा बळींसह वन्यप्राण्यांच्या बळीचा आकडा ७९ वर जातो. पर्यटकांना जंगल व वाघ पाहायला मिळावेत म्हणून जंगलात राहणाऱ्या गरीब, दुबळ्या लोकांनी वाघांच्या जबड्यात त्यांची मानगुट का द्यायची, हा विदर्भातील भोळ्याभाबड्या माणसांचा सरकारला, व्यवस्थेला सवाल आहे. व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यासाठी आधी विदर्भातील अरण्यप्रदेशावर विस्थापनाचे संकट होते. त्यातून कशीबशी सुटका होत नाही तोवर आता हे वाघांचे संकट उभे राहिले आहे.
वाचण्यासाठी क्लिक करा - अधिवेशन ते अधिवेशन ७९ बळी...

पंचवीस लाख दिले की जबाबदारी संपली का?
वन्यजीव संरक्षणाची, वाघ सांभाळण्याची गरज आहेच. कारण, वाघ ही एक संकटग्रस्त प्रजाती आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी वाघ महत्त्वाचे आहेत. वाघांची संख्या वाढल्यामुळे पर्यटन वाढले हेदेखील खरे. वन्यजीव पर्यटन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देते. नोकऱ्या निर्माण करते. तथापि, माणसाच्या जिवाचे मोल या सगळ्या फायद्यापेक्षा अधिक आहे. व्याघ्रसंवर्धन, पर्यटन आणि स्थानिकांचे जीव असा संतुलित दृष्टिकोन गरजेचा आहे. तथापि, तसे होताना दिसत नाही. आम्ही माणसांच्या जिवाचीही काळजी करतो असे दाखविण्यासाठी वन्यजीवांच्या बळींना पंचवीस लाख रुपये देऊन शासन व प्रशासन नामानिराळे होते. दुर्दैव हे की, अशी मृतदेहांवर २५ लाखांची मदत फेकणे हा त्या सामान्य जिवांचा अपमान आहे, याचेही भान कुणाला नाही.
एका जिल्ह्यात ४५ लोक वाघाचे भक्ष्य बनत असतील तर ते दुर्दैव
मानव वन्यजीव संघर्ष थांबविण्यात वनविभागाला अपयश आले आहे हे मान्यच करावे लागेल, यासाठी वन विभागाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही उपाययोजना प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. सोबतच पीआरटी कमिट्यांची संख्या वाढवावी. अधिकाधिक वाघांचे इतर अभयारण्यात स्थानांतरण करायला हवे. एका जिल्ह्यात ४५ च्या आसपास लोक वाघाचे भक्ष्य बनत असतील तर ते दुर्दैव आहे. मी वनमंत्री असताना २५ लाखांची मदत जाहीर केली होती. ती आता ५० लाख करण्याची गरज आहे. पण, मुळात मदत देण्याची वेळच होऊ नये अशा उपाययोजना व्हाव्यात. माणसांचा जीव वाचवणे हे अधिक महत्त्वाचे, असे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.