नागपुरातून मुंबईला जाणारे प्रवासी चिंतेत, मुंबईत मुसळधार पाऊस, तीन उड्डाणांना उशीर, एक रद्द
By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 8, 2024 21:53 IST2024-07-08T21:53:03+5:302024-07-08T21:53:29+5:30
मुसळधार पावसामुळे विमानतळावर प्रवाशांना फटका बसला

नागपुरातून मुंबईला जाणारे प्रवासी चिंतेत, मुंबईत मुसळधार पाऊस, तीन उड्डाणांना उशीर, एक रद्द
मोरेश्वर मानापुरे, नागपूर: रविवारी रात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कंपन्यांच्या विमानसेवांवर परिणाम झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागपुरातून मुंबईला जाणारे हवाई प्रवासी विमानतळावर ताटकळत होते. इंडिगोची तीन विमाने मुंबईतून नागपुरात उशिरा पोहोचली, तर एक रद्द झाले. एअर इंडियाचे विमान नागपुरात ३ तास २० मिनिटे उशिरा पोहोचले.
मुसळधार पावसामुळे मुंबईहून अनेक विमानांचे मार्ग बदलले तर काहींचे वेळापत्रक बदलण्यात आले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना फटका बसला.
सोमवारी इंडिगो एअरलाइन्सचे ६इ ५१३२ मुंबई-नागपूर विमान ६.२५ ऐवजी रात्री ८ वाजता निघाले. इंडिगोचे ६इ ८०४ हे मुंबई-नागपूर रद्द करण्यात आले. एअर इंडियाचे एआय ६२९ मुंबई-नागपूर विमान रात्री ८.५५ ऐवजी रात्री १२.०२ वाजता येण्याची शक्यता आहे. विलंबामुळे नागपूर विमानतळावर प्रवासी मोठ्या संख्येने विमानाच्या प्रतीक्षेत होते.