लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात मार्चमध्ये झालेल्या दंगलीत नुकसान झालेल्या वाहनांच्या मालकांना प्रशासनाकडून अद्याप भरपाई मिळालेली नाही. तीन महिने उलटूनही त्यांना सरकारी विभागांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोलिस आणि प्रशासनाने भरपाईची रक्कम निश्चित केल्यानंतरही ती देण्यास एवढा विलंब का होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
या पीडितांपैकी एक असलेले चिटणवीस पार्कजवळ राहणारे मधुसूदन सिंघानिया. त्यांनी 'लोकमत'शी बोलताना आपली व्यथा सांगितली. सिंघानिया म्हणाले, १७ मार्च रोजी महाल परिसरात अचानक दंगल उसळली. यादरम्यान, दुरुगकर चाळ परिसरात पार्क केलेली एक कार दंगलखोरांनी पेटवून दिली. बाइक क्रमांक सीजी १० बीके ३६२४ देखील या कारजवळ पार्क केलेली होती. दंगलखोरांनी या बाइकची तोडफोड केली आणि गाडीचा आरसा आणि हेल्मेटही सोबत घेऊन गेले. घटनेनंतर पोलिसांनी जबाब नोंदवून पंचनामा केला. पण, पंचनाम्याची प्रत मिळविण्यासाठी अनेक दिवस गणेशपेठ पोलिसांकडे जावे लागले. फाइल क्लीअर करण्यासाठी महिनाभर एसडीएम कार्यालयात चकरा मारल्या. काम न झाल्याने अखेर एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटून विनवणी केली.
त्यानंतर फाइल क्लीअर करण्यात आली. मधुसूदन सिंघानिया यांना मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने हर्ष बुल्स प्रायव्हेट लिमिटेड, बिलासपूरच्या नावाने १० हजार रुपये भरपाई म्हणून मंजूर केले. त्यांच्याप्रमाणेच, विलास शंकर यांच्या घराच्या नुकसानीसाठी ३५ हजार रुपये, अक्षय श्रीवास यांच्या दुकानाच्या नुकसानीसाठी २० हजार आणि संकेत मंगरूळकर यांच्या गाडीच्या नुकसानीसाठी ४० हजार रुपये मंजूर करण्यात आले. परंतु, गेल्या एक महिन्यापासून सिंघानिया भरपाई मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.