गणेश हूड/ नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ ते २०२५ या अकरा वर्षांत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या क्षेत्रात प्रगती केली आहे. या ‘विकसित भारताचा अमृत काल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालखंडाचा गौरव करण्यासाठी नागपूर शहर भाजपतर्फे विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष दयाशंकर निवारी यांनी मंगळवारी पक्षकार परिषदेत दिली. या ११ वर्षांत २६ कोटी नागरिक दारिद्र रेषेच्यावर आले, घरकुल, वीज, पाणी, शौचालय आणि अन्नसुरक्षा अशा मुलभूत गरजा पूर्ण झाल्या. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूरात कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
१२ जूनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होणार आहे. २०० जनसंवाद सभा, २० संकल्पसभा, चित्रप्रदर्शने, संवाद मेळावे, चौपाळ संवाद, शिबिरे, आयटी स्पर्धा, सोशल मीडिया चर्चा आणि २१ जूनला सुरेश भट सभागृहात विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत "घर चलो" उपक्रमाद्वारे नागपूरकरांच्या घरोघरी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवली जाणार असल्याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली. यावेळी माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलींद माने, गिरीश व्यास, संदीप जाधव, बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.
असे राबविणार उपक्रम
- आयटी सेल स्पर्धा: केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या प्रगतीवर आधारित डिजिटल मिडिया स्पर्धा
- चित्रप्रदर्शने: ६ विधानसभा क्षेत्रांत केंद्र सरकारच्या कामगिरीचे दृश्य प्रदर्शन.
- कल्याणकारी योजनांसाठी शिबिरे: २० मंडळांमध्ये शासकीय योजना नागरीकांपर्यंत पोहोचविणार
- सोशल मिडिया पॅनल चर्चा: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी शासनाच्या उपलब्ध्यांवर चर्चा.
- चौपाळ संवाद: शहरातील उद्याने, चौक, मॉल्समध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीवर संवाद.
- विशेष संवाद सत्र: २१ जून रोजी सुरेश भट सभागृहात
- "घर चलो" अभियान: केंद्र व राज्य सरकार तसेच मनपाच्या योजनांची माहिती देणार