Maharashtra Winter Session 2022 : ऊर्जामंत्री बोलत असतानाच सभागृहात बत्तीगुल! रोहित पवारांनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:48 IST2022-12-20T16:46:35+5:302022-12-20T16:48:20+5:30
Rohit Pawar : याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maharashtra Winter Session 2022 : ऊर्जामंत्री बोलत असतानाच सभागृहात बत्तीगुल! रोहित पवारांनी साधला निशाणा
नागपूरः राज्याचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असतानाच सभागृहात बत्तीगुल झाली. त्यामुळे सभागृहातील सर्वांना वीज गेल्यावर कशी समस्या निर्माण होते, याचा अनुभव आला. वीजेच्या समस्येमुळं तब्बल 50 मिनिटं सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आल्याचं सांगण्यात आले.
याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडलं.. आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटामिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं! यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?", असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडलं..
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 20, 2022
आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटामिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं! यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना आणि निधीला स्थगिती देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला यावेळी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जुंपली.
अजित पवारांचा घणाघात...
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर झालेल्या अनेक कामंना स्थगिती दिल्याचा दावा केला. यावरुन सभागृहात विरोधकांनी एकच हल्लाबोल केला. "बजेटमध्ये मंजूर झालेली कामं होती, ही महाराष्ट्रातील कामं आहेत. ही काही कर्नाटक आणि गुजरातची कामं नाही", असा असा हल्लाबोल अजित पवारांनी केला. तसंच आम्ही अनेक सरकारं बघितली, मनोहर जोशी, नारायण राणेंचं सरकार बघितलं, देवेंद्रजी तुमचंही सरकार ५ वर्ष बघितलं. सरकार येतात-जातात, तुमची पहिली टर्म आहे, पण आमच्या सात-सात टर्म झाल्या आहेत. पण अशी मंजूर झालेली व्हाईट बूक झालेली कामं कधी थांबली नव्हती", असा घणाघात अजित पवारांनी केला.
फडणवीस म्हणाले, 'तुमच्याकडूनच शिकलो!'
"विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुद्दा मांडला, पण मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही सात-सात वेळा निवडून आले असाल, आम्ही कमी निवडून आलो. पण काही गोष्टी तुमच्याचकडून शिकलो आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. त्यावेळी तुम्ही आमची सगळी कामं रोखली, माझ्या मतदारसंघातील कामं तुम्ही रोखली. अनेक वर्ष भाजपच्या लोकांना नवा पैसा दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही", असं फडणवीस म्हणाले. तसेच, ज्या स्थगिती दिल्या आहेत, त्यापैकी ७० टक्के स्थगिती उठवली आहे, शेवटच्या स्थगिती आहेत, त्या कामांना मंजुरी देताना कोणत्याही तरतुदी पाळल्या नाहीत. नियम न पाळता खर्च केले. त्याचा पुनर्विचार करुन आवश्यक त्या स्थगिती उठवू आणि कुणावरही अन्याय होणार नाही, योग्य आणि आवश्यक निर्णय घेऊ, असंही फडणवीस यांनी सांगितलं.