राजेश शेगोकारनागपूर : झटपट प्रसिद्धीच्या नादात अनेक तरुण-तरुणी जीवाशी खेळणारे स्टंट करत आहेत. ते व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यावर मिळणारे लाइक्स, शेअर्स आणि कमेंट्स हाच आता 'लोकप्रियतेचा मापदंड' झाला आहे, जणू काही आयुष्याचा अंतिम उद्देशच 'व्हायरल' होण्यात आहे! इन्स्टा, फेसबुक, एक्स, व्हॉट्सअॅप ही व्यासपीठं गरज नव्हे तर व्यसन झाली आहेत. सोशल मीडियाच्या व्यसनातून 'रील'च्या दुनियेची इतकी भुरळ पडली आहे की, त्यातून रिअल लाइफची राखरांगोळी होत आहे. विशेष म्हणजे, याचे भानसुद्धा त्यांना नाही. यामध्ये आता अधिकारी अन् पोलिसही मागे नाहीत हे नागपूरसह राज्यभरात समोर आले आहे.
प्रत्येकाच्या हातात आलेला स्मार्टफोन हा अशा माध्यमांवर व्यक्त होण्याचा राजमार्ग आहे. त्यातूनच सोशल मीडियाचे जग हे खूपच सुंदर, मनोवेधक आहे, यावर अशा पिढीचा विश्वास बसला व त्याचे व्यसन कधी लागले हे कोणालाही कळले नाही. सोशल मीडियाचा वापर करणारे भारतात ४६७ दशलक्ष लोक झाले आहेत. ही आकडेवारी तंत्रज्ञानाच्या युगाकडे आपण जात असल्याचा अभिमान निर्माण करणारी असली, तरी याच तंत्रज्ञानाचा वापर नादावल्यासारखा होत आहे. विशेष म्हणजे अनेक अधिकारीही आपले सेवानियम धाब्यावर बसवून रीलच्या मागे लागले आहेत.
तासनतास मोबाइलवर रील्स पाहणाऱ्या पिढीला आता यू ट्यूबवर कमाईचाही मार्ग सापडला आहे. पण त्यासाठी हवाय थोडा थ्रिल - थोडा 'जोखिमांचा तडका' आणि मग निर्माण होते ती 'कर के देख लेंगे' वृत्ती जी थेट आयुष्याशी खेळते. मानसशास्त्र सांगते की, सततची डिजिटल प्रसिद्धी ही मेंदूला सवय लावते. डोपामिन हायजॅकिंग म्हणतात त्याला. एकदा त्या 'हाय'ची चटक लागली की, मग रीलची मजा रिअल जगाच्या शिस्तीला नकोशी वाटते. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि त्यातून उगम पावलेली ही सुंदर पण मोहक आभासी दुनिया आहे.
मुळात प्रश्न असा आहे की, सोशल मीडियावरील हे 'कंटेंट' टिकणार किती? दोन मिनिटं झळकणारं रील आणि मग विसरून जाणारी दुनिया. पण त्या क्षणिक लाईक्ससाठी काही जणांनी कायमचं काही गमावलं आहे. वास्तविकता अशी की, लाईक्स देणारे लोक उद्या अंत्यसंस्कारालाही येणार नाहीता खरंतर डोळ्यांवर पडणारा सततचा स्क्रीन लोड, मानसिक थकवा, एकाकीपणा, नात्यांमधली संवादाची गळती हे आहे रीलच्या मागचं वास्तव.
माणूस आता स्वतःला जगासमोर 'प्रेझेंट' करताना स्वतःपासूनच दूर जातोय. खरंतर सध्या एक आभासी जगदेखील वास्तविक जगाच्या समांतर चालत आहे. त्यामुळे प्रत्येकावर आपले सुख-दुःख इतरांसोबत शेअर करण्याचा अदृश्य दबाव आला आहे असेच जाणवते.यातून निर्माण झाली भावनिक असुरक्षितता, एक दिवस आपली खरी ओळखच गिळून टाकणार तर नाही अशी भीती आहे. वाढलेले शेअरिंग तुमच्या भावनांना कृत्रिम मुलामा देते. लाईक, कमेंट करणारे कदाचित तुम्हाला ओळखतील, पण तुमचे खरे सुखदुःख समजून घेण्यासाठी ही आभासी दुनिया कामाची नाही हे समजलं, तर कदाचित आपण 'रील्स' करताना रिअल लाईफ धोक्यात घालणार नाही. कारण पुढचा बळी... कदाचित तुमच्याच घरातला असू शकतो.
हा नवा इमोशनल व्हायरस
- सोशल मीडियाचे व्यसन फक्त वेळ आणि ऊर्जा चोखत नाही, तर एक मानसिक आजार देते. यामध्ये आत्मसन्मान म्हणा की मूल्य म्हणा ते आता फॉलोअर्सच्या संख्येवर अवलंबून ठरते.
- सतत इतरांशी तुलना, सततची अपेक्षा, माझ्या पोस्टला किती लाईक्स? त्याला किंवा तिला इतके फॉलोअर्स का? मला का नाही?
- हे मानसिक अस्वस्थतेचे मूळ आहेत. FOMO (Fear of Missing Out) फोमो म्हणजे सतत काही तरी हरवण्याची भीती यासारख्या विकारांना चालना देणारा हा नवा 'इमोशनल व्हायरस' आहे.