एका बॅगमध्ये लॅपटॉप, तर दुसरीत होती रोख रक्कम; बॅग केल्या परत ! रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांची कामगिरी
By नरेश डोंगरे | Updated: March 16, 2026 19:40 IST2026-03-16T19:39:42+5:302026-03-16T19:40:15+5:30
Nagpur : प्रवासाला निघाल्यानंतर घाईगडबडीत बॅग विसरल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना नागपूर आणि नरखेड येथे घडल्या. मात्र, तक्रार वजा माहिती मिळताच दोन्ही बॅग शोधून त्यातील लॅपटॉप तसेच रोख रक्कम संबंधित प्रवाशांना परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी बजावली.

Laptop in one bag, cash in another; Bags returned! Railway Protection Force personnel's performance
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवासाला निघाल्यानंतर घाईगडबडीत बॅग विसरल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना नागपूर आणि नरखेड येथे घडल्या. मात्र, तक्रार वजा माहिती मिळताच दोन्ही बॅग शोधून त्यातील लॅपटॉप तसेच रोख रक्कम संबंधित प्रवाशांना परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी बजावली.
रविवारी, १५ मार्चला एक प्रवासी येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर असलेल्या फूड स्टॉलवर आला. तेथे त्याने चहा-नाश्ता घेतल्यानंतर घाईगडबडीत बॅग तेथेच ठेवली आणि पुढच्या प्रवासाला निघून गेला. बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्याने रेल मदत अॅपच्या माध्यमातून कंट्रोल रूमला संदेश दिला. तो आरपीएफला कळताच स्थानिक कर्मचाऱ्यांनी लगेच तो फूड स्टॉल गाठला त्या प्रवाशाची बॅग शोधली. बॅगमध्ये लॅपटॉप आणि ईतर महत्वाच्या चिजवस्तू होत्या. संबंधित प्रवाशाला बोलवून शहानिशा केल्यानंतर ती बॅग आणि चिजवस्तू परत करण्यात आल्या.
दुसरी अशीच घटना आरपीएफ नरखेड चाैकीच्आ माध्यमातून उघड झाली. ट्रेन नंबर १८२३७ छत्तीसगड एक्सप्रेसच्या एस-६ कोचमध्ये एका प्रवाशाची बॅग राहून गेल्याची माहिती रेल मदत अॅपवर आली. ती आरपीएफला कळल्यानंतर सबंधित जवानांनी त्या कोचमध्ये जाऊन ती बॅग ताब्यात घेतली. बॅग मिळाल्याचे कळताच तो प्रवासीही नागपूर रेल्वे स्थानकावरच्या आरपीएफ चाैकीत पोहचला. त्याने बॅगची ओळख पटवली. बॅगमध्ये रोख रक्कम आणि अन्य चिजवस्तीही होत्या. त्या संबंधित प्रवाशाला परत करण्यात आल्या.
तातडीने द्या माहिती !
कोणत्याही प्रवाशाचे साहित्य अथवा कोणतीही चिजवस्तू चोरीला गेली किंवा गहाळ झाली आणि त्या प्रवाशाने तातडीने रेल मदत किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती कळविल्यास ती चिजवस्तू शोधणे शक्य होते. परिणामी संबंधित चिजवस्तू तातडीने परत मिळू शकते. त्यामुळे प्रवाशांनी त्यांचे साहित्य अथवा काही चोरीला गेले किंवा गहाळ झाले तर रेल मदत अॅप किंवा रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांना तातडीने कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.