कुन्हाड, टिकास व सब्बलने वार करून भाच्याने मामाला संपवले; किरकोळ वाद ठरला हत्येचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:23 IST2026-02-23T18:19:39+5:302026-02-23T18:23:02+5:30
Nagpur : दारू प्यायल्यानंतर मामा व भाच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले आणि याच भांडणात भाच्याने मामाची कुन्हाड, टिकास व सब्बलने वार करून निघृण हत्या केली.

Kunhad, Tikas and Sabbal stabbed nephew to death; Minor dispute was the reason for the murder
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंगी: दारू प्यायल्यानंतर मामा व भाच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले आणि याच भांडणात भाच्याने मामाची कुन्हाड, टिकास व सब्बलने वार करून निघृण हत्या केली. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे रविवारी (दि. २२) रात्री ८:४० वाजताच्या सुमारास घडली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
केसरी गज्जू कावरे (वय ५०, रा. बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृत मामाचे, तर सूर्यकांत कलतराम नागेश्वर (२१, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भाच्याचे नाव आहे. केसरी हा पाटणसावंगी येथील आरामशीनमध्ये कामगार म्हणून काम करायचा आणि आरामशीनजवळ असलेल्या खोलीत राहायचा. सूर्यकांत हा पाटणसावंगी येथील बीअर बारमध्ये वेटर म्हणून काम करायचा. विशेष म्हणजे, दोघांनाही दारूचे व्यसन होते.
केसरी रविवारी रात्री सूर्यकांतच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत होते. घरातील मंडळीसमोर किरकोळ कारणावरून त्या दोघांमध्ये शाब्दिक भांडण झाले आणि ते विकोपास गेले. काही कळण्याच्या आत सूर्यकांतने केसरीवर कुन्हाड, टिकास व सब्बलने वार केले. गंभीर दुखापतीमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सागर खर्डे, ठाणेदार उमेश पाटील सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करीत आरोपीला अटक केली व केसरीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाळू राठोड व शिपाई कपोल तभाने करीत आहेत.
डोके व छातीवर वार
आरोपी सूर्यकांतने केसरीच्या डोके व छातीवर कुऱ्हाड आणि सबलीने जबर वार केले. त्याच्या खोल जखमा त्याच्या शरीरावर स्पष्ट दिसून येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाहून त्याने हत्या करण्यासाठी वापरलेली कुन्हाड, टिकास व सब्बल जप्त केली आहे. हत्या केल्यानंतर सूर्यकांत पळून गेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला गावातून लगेच ताब्यात घेत अटक केली. त्याने केसरीची हत्या का केली, हे मात्र त्याने पोलिसांना अद्याप सांगितले नाही. हत्येचे मूळ कारण तपासात पुढे येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.