जगातले युद्धे थांबविण्याची क्षमता भारतातच : मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:20 IST2026-03-21T15:19:27+5:302026-03-21T15:20:00+5:30
Nagpur : जगातील संघर्षाचे मूळ कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना असून कायमस्वरूपी शांतता ही एकता, शिस्त आणि धर्मपालनातूनच साध्य होऊ शकते.

India has the ability to stop wars in the world: Mohan Bhagwat
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगातील संघर्षाचे मूळ कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना असून कायमस्वरूपी शांतता ही एकता, शिस्त आणि धर्मपालनातूनच साध्य होऊ शकते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत केवळ भारतच युद्ध थांबवू शकतो, अशी अपेक्षा जगभरातून व्यक्त होत असून तोच आपल्या देशाचा स्वभावही आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी जुने सुभेदार ले-आउट, अयोध्यानगर येथे विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी डॉ. भागवत बोलत होते. कार्यक्रमाला संत त्रिलोकदर्शन दासजी महाराज, गाझियाबाद, अंजनगाव सूर्जी येथील देवनाथ मठाचे प. पू. जितेंद्रनाथ महाराज, केंद्रीय संघटनमंत्री मिलिंद परांडे, प्रसिद्ध उद्योजक अनंतकुमार बन्सल, राजेश गुप्ता यांच्यासह व्हीएचपीचे अध्यक्ष सुदर्शन शेंडे, नंदकिशोर दंडारे, हेमंत जांभेकर, मनीष मालानी, प्रशांत तितरे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मोहन भागवत म्हणाले, जगातील अस्थिर परिस्थितीत संतुलन निर्माण करून धर्माधिष्ठित मूल्यांवर आधारित व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी भारतावर आहे. भारतातील लोक मानवतेच्या नियमांनुसार आचरण करतात, तर जगातील अनेक भाग अजूनही 'जंगलाच्या नियमां'वर चालतात. गेल्या दोन हजार वर्षात विविध विचारसरणींच्या माध्यमातून संघर्ष सोडविण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. आजही धार्मिक असहिष्णुता, सक्तीचे धर्मातर आणि उच्च-नीचतेची भावना अस्तित्वात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेत 'सर्व एक आहेत' ही भावना मांडण्यात आली असून समाजाने संघर्षाऐवजी सहकार्य आणि समरसतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन करीत आधुनिक विज्ञानही हळूहळू याच विचारांकडे झुकत असल्याचे त्यांनी नमूद केले.