'तुझे पुन्हा लग्न लावून देतो..' वडिलांनी पळून गेलेल्या मुलीला घरी बोलावून ठेवले डांबून, हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:50 IST2026-03-14T15:31:33+5:302026-03-14T17:50:04+5:30
Nagpur : आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीला घरामध्ये बळजबरीने डांबून ठेवून तिचा शारीरिक-मानसिक छळ करणाऱ्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली आणि संबंधित प्रेमीयुगुलाचे पुन्हा मिलन झाले.

'I will get you married again..' Father calls runaway daughter home and keeps her in custody, High Court gives important decision
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीला घरामध्ये बळजबरीने डांबून ठेवून तिचा शारीरिक-मानसिक छळ करणाऱ्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली आणि संबंधित प्रेमीयुगुलाचे पुन्हा मिलन झाले. या घटनेतून, मियां बीवी राजी तो क्या करेगा काजी ! या प्रसिद्ध म्हणीचा प्रत्यय सर्वांना आला.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील पवन आणि बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पूनम (दोन्ही नावे काल्पनिक) यांनी १६ जानेवारी २०२६ रोजी अमरावतीमधील संत गजानन महाराज मंदिरात हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न केले. त्यानंतर चंद्रविला ट्रस्टकडे लग्नाची नोंदणी केली. दरम्यान, ते काही दिवस अकोला येथे राहून उत्तर भारतात निघून गेले. त्यामुळे पूनमच्या वडिलांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तसेच, पूनमशी संपर्क साधून तिला पवनसोबत लग्न लावून देण्याचे आश्वासन देत परत बोलावले. त्यामुळे पूनम व पवन अकोला येथे परत गेले असता वडिलांनी शब्द पाळला नाही. त्यांनी पूनमला बळजबरीने घरी नेऊन डांबून ठेवले. तसेच, पूनमला विसरून जा, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पवनला दिली.
यासंदर्भात पवनने पोलिस ठाण्यात तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, पवनने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल पानसरे व निवेदिता मेहता यांच्यापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने पूनमला हजर करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी पूनमला १० मार्च रोजी न्यायालयात आणल्यानंतर तिने स्वतःच्या मर्जीने पवनसोबत लग्न केल्याचे आणि तिला पवनसोबत राहायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने पूनमला पवनच्या सुपूर्द केले. पवनतर्फे अॅड. गणेश मते यांनी बाजू मांडली.
अशी जुळली मने
पवन वैद्यकीय कंपनीत व्यवस्थापक असून पूनम मेडिकल स्टोअर्समध्ये कर्मचारी आहे. त्यांची २०२२ मध्ये मैत्री झाली. त्यानंतर सतत संपर्कात राहिल्यामुळे ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पूनम उच्च जातीची असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी पवनला स्वीकारले नाही. परिणामी, त्यांनी पळून जाऊन लग्न केले.