विदर्भात ऑटोमोबाईल क्षेत्रातील गुंतवणूक, महिंद्रा गुंतवणार १५ हजार कोटी
By योगेश पांडे | Updated: February 6, 2026 19:21 IST2026-02-06T17:09:47+5:302026-02-06T19:21:00+5:30
नेक्स जेन कारची निर्मिती नागपुरात : १० हजार लोकांना रोजगार मिळेल, मुख्यमंत्र्यांचा दावा

For the first time, investment in the automobile sector in Vidarbha, Mahindra will invest 15 thousand crores
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विदर्भासाठी मोठ्या गुंतवणूकीचा सामंजस्य करार झाला. महिंद्रा ॲंड महिंद्रा कंपनीने विदर्भात १५ हजार कोटी गुंतवणूक करण्याबाबत करार केला आहे. कंपनीकडून नागपुरात नेक्ट जेन व अत्याधुनिक एसयूव्हीची फॅक्टरी टाकणार आहे. ही इन्टिग्रेटेड फॅक्टरी असेल व त्यात ईव्ही कार, नेक्स्ट जेन कार व ट्रॅक्टर्स तयार होतील. यातून दहा हजार लोकांना रोजगार मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कार्यक्रमानंतर शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवात एकूण चार सामंजस्य करार करण्यात आले. त्यातील महिंद्रा ॲंड महिंद्रासोबत झालेला करार महत्वाचा आहे. पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातील गुंतवणूक विदर्भात आली आहे. महिंद्रा ॲंड महिंद्रा नेक्ट जेन व अत्याधुनिक एसयूव्हीची फॅक्टरी टाकणार आहे. ही महिंद्राची सर्वात मोठी फॅक्टरी असेल. छत्रपती संभाजीनगर व नाशिकमध्येदेखील ते गुंतवणूक करत आहेत. आम्ही त्यांना सोळाशे एकर जागा त्यांना देणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
२०२८ पासून उत्पादनाला सुरुवात
ही गुंतवणूक आगामी दहा वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने होणार असून, २०२८ पासून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे १५० एकर क्षेत्रावर सप्लायर पार्क उभारण्यात येणार असून, पुढील टप्प्यात त्याचा विस्तार इगतपुरी येथे सुमारे ३०० एकर क्षेत्रावर करण्यात येणार आहे.
अजित पवारांच्या मृत्यूनंतरचे राजकारण खालच्या पातळीचे
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर जो काही वाद होतो आहे तो निरर्थक व चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती यात स्वत:चे राजकारण पाहण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री व मोठे नेते होते. त्यांच्यानंतर होणारे राजकारण चुकीचे असून खालच्या पातळीचे हे राजकारण बंद झाले पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.