नागपूर : देशातील विरोधी पक्ष कमकुवत असल्यानेच आम्हाला आंदोलन करावे लागले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने आपली शक्ती दाखवावी, असे प्रतिपादन संयुक्त किसान मोर्चाचे कोर कमिटी सदस्य राकेश टिकैत यांनी केले. संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी सुरू असलेल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राकेश टिकैत नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.
18 जानेवारीला महिला किसान सन्मान दिवस आहे. त्याची तयारी सुरू असल्याची माहिती देऊन ते म्हणाले, 23 जानेवारीला 1000 ट्रॅक्टरसह राजभवनला घेराव घालण्याचे नियोजन आहे. मात्र, हे राजभवन मुंबई, नागपूर किंवा पुणे यापैकी कुठले असेल, हे वेळेवर ठरवले जाईल, असे त्यांनी सांगितले. 26 जानेवारीला सुद्धा देशव्यापी आंदोलन उभारले जाईल. मात्र ते कशा स्वरूपाचे असेल, हे राकेश टिकैत यांनी जाहीर केले नाही.
कृषी कायदा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. हे आंदोलन दूरवर चालेल, कदाचित ते 2024 पर्यंतही चालेल. मात्र कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही हटणार नाही, असा दृढ निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, आमचे आंदोलन कुण्याही पक्षाविरोधात नाही तर केंद्र सरकारने केलेले तीन बिल परत द्यावे, या एकमेव मागणीसाठी आहे. सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार मानतो. पण त्यांनी तयार केलेल्या समितीसमोर जाणार नाही ,असा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी केला.