१०० टक्के सफाईचा फोल दावा : कोट्यवधी खर्चुनही नद्या अस्वच्छच !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:43 IST2025-06-26T16:42:04+5:302025-06-26T16:43:14+5:30
मनपाचा दावा फोल : पावसाळ्यात नदीकाठच्या लोकांचे जीवन धोक्यात

False claim of 100 percent cleanliness: Rivers remain unclean despite spending crores!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :नदी स्वच्छतेच्या नावावर गेल्या ५ वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्च झाले आहे. तरीही नद्या अस्वच्छच आहेत. यावर्षीही नदी सफाईवर सव्वाकोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने शहरातील तीनही नद्या १०० टक्के स्वच्छ झाल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र मनपाचा दावा फोल ठरतोय.
२०२० ते २०२४ या पाच वर्षांत नदी स्वच्छतेवर ५.६५ कोटी रुपये खर्च झाले. नद्यांची सफाई न केल्यास पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. त्यात नदी-नाल्यांच्या संरक्षण भिंती तुटल्या होत्या. त्या संरक्षण भिंती अजूनही उभ्या झाल्या नाहीत. त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना नद्यांच्या काठावर राहणाऱ्यांच्या जीवनाला धोका आहे.
शहरातून वाहणाऱ्या नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीची लांबी ४९.१७ आहे. मनपा प्रशासनाचा दावा आहे की, तीनही नद्यांची १०० टक्के सफाई झाली आहे. सफाईच्या नावावर नदीच्या पात्रातील माती काढून काठावर सोडून दिली आहे. नद्यांमध्ये अजूनही जलपर्णी व कचरा दिसून येत आहे. काही ठिकाणी वरवरच स्वच्छता केल्याचेही स्पष्ट दिसत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीत आरोप केला होता की, मेट्रो रिजनअंतर्गत असलेल्या नद्यांच्या भागाची सफाई झालेली नाही. ३० जूनपर्यंत सफाईचे काम पूर्ण करावे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, नद्यांची १०० टक्के सफाई झालेली नाही. तरीही मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दावा केला की, नद्यांची सफाई पूर्ण झाली आहे.
नदी स्वच्छतेला लोकसहभागातून झाली होती सुरुवात
२०१३ मध्ये महापौर अनिल सोले यांनी नदी सफाईची संकल्पना लोकसहभागातून मांडली होती. दोन वर्षे या संकल्पनेतून नदीची सफाई झाली. त्यानंतर मात्र कंपनी व ठेकेदारांकडून यंत्रणा उपलब्ध झाली नाही. परिणामी महापालिकेने बजेटमध्ये नदी स्वच्छतेसाठी विशेष तरतूद केली. तेव्हापासून या तरतुदीअंतर्गत सफाई केली जात आहे.
'लोकमत'ने केली पोलखोल
महापालिकेने न्यायालयांमध्ये शहरातील नद्या ९५ ते १०० टक्के स्वच्छ झाल्याचा दावा केला होता. मनपाच्या दाव्यानुसार 'लोकमत'ने शहरातील नद्यांच्या अवस्थेवर मालिका प्रसिद्ध केली. या वृत्तांमधून प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली.