अमरावती जिल्ह्यातील सेक्स स्कॅंडलच्या आरोपींचे एन्काऊन्टरच करा; प्रवीण तोगडिया यांची मागणी
By योगेश पांडे | Updated: April 17, 2026 21:55 IST2026-04-17T21:54:41+5:302026-04-17T21:55:38+5:30
लव्ह जिहाद करणाऱ्यांवर देशभरात कठोर कारवाई हवी

अमरावती जिल्ह्यातील सेक्स स्कॅंडलच्या आरोपींचे एन्काऊन्टरच करा; प्रवीण तोगडिया यांची मागणी
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परतवाडा येथील लैंगिक छळाच्या प्रकरणात आता आंतराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनीदेखील उडी घेतली आहे. या सेक्स स्कॅंडलच्या आरोपींचे थेट एन्काऊन्टरच केले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. सोबतच लव्ह जिहाद करणाऱ्यांवर देशभरातच कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली. नागपुरात शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे प्रकार सुरूच आहेत. देशाचा कोणताही कोपरा यापासून मुक्त नाही. देशात मुघलांप्रमाणेच त्यांचा हल्ला सुरू झाला आहे. जर सरकारी यंत्रणा यावर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरली, तर प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराज उभे राहती आणि हिंदू प्रत्युत्तर देतील. परतवाडा येथील आरोपींना निश्चितपणे अनेक लोकांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय ते इतके मोठे पाऊल उचलूच शकत नाही. अशा लोकांनादेखील शोधून कारवाई केली पाहिजे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला हवे, असे तोगडिया म्हणाले.
मुलींना वाटणार ओजस्विनी वायर
अशा प्रकारांपासून दूर राहण्यासाठी विद्यार्थिनींमध्ये जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. तसेच महिला सुरक्षा प्रशिक्षण आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी महिला शिक्षण आणि प्रशिक्षण दिले पाहिजे. आमच्या संघटनेतर्फे महिला व तरुणींना ओजस्विनी वायर हे उपकरण देण्यात येणार आहे. सलगी करणाऱ्या लोकांना यातून वीजेचा धक्का देता येईल. तसेच आम्ही एक अत्युत्तम मिरची स्प्रेदेखील विकसित करत आहोत, असे तोगडिया यांनी सांगितले.
सर्व मदरसे बंद करा
देशातील तसेच महाराष्ट्रात मदरशांतून लव्ह जिहादसारखे उपक्रमाला चालना देण्यात येत आहे. हे सर्व मदरसे बंद करा व तेथील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणा, अशी मागणी डॉ.तोगडिया यांनी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे ऐकतात व माझे ऐकून ते याबाबत पावले उचलतील असा विश्वास असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
देशातील एक लाख स्थानांवर हनुमान चालिसा पठण
देशभरातील सुमारे एक लाख हनुमान चालिसांचे पठण करण्याचे उद्दिष्ट घेऊन आम्ही काम करत आहोत. हनुमान चालिसाचे पठण मंगळवार किंवा शनिवारच्या संध्याकाळी केले जाईल. या माध्यमातून कोट्यवधी कुटुंब एकमेकांशी जोडले जातील. नागपुरात १०१ ठिकाणी हे पठण सुरू होणार आहे, असे डॉ.तोगडिया यांनी सांगितले.