महाबोधी महाविहार ताब्यासाठी निर्णायक क्षण, आकाश लामा यांचा दावा , दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेसला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:46 IST2025-06-01T19:44:05+5:302025-06-01T19:46:29+5:30
बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे सर्वात पवित्र स्थान आहे.

महाबोधी महाविहार ताब्यासाठी निर्णायक क्षण, आकाश लामा यांचा दावा , दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेसला भेट
आनंद डेकाटे, नागपूर: बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे सर्वात पवित्र स्थान आहे. हे पवित्र स्थळ १३४ वर्षांपासून बौध्दांकडे नाही. मात्र, गेल्या ११० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे फलित म्हणजे सवोंच्च न्यायालयाने तब्बल १२ वर्षानंतर याचिकेवर सुनावणी घेतली. तसेच, २९ जुलैला यासंदर्भात अंतीम सुनावणी आहे. धैर्य आणि शांती हे या आंदोलनाचे मुख्य आधार आहेत. त्यामुळे आताचे आंदोलन हे निर्णायक क्षणावर येऊन ठेपले असल्याचा दावा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते व ऑल इंडीया बुद्धिस्ट फोरमचे महासचिव आकाश लामा यांनी केला. रविवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी ते आले असता दीक्षाभूमीवर पत्रकारांशी बोलत होते. लामा यांनी दीक्षाभूमी येथे तथागत गौतम बुध्दांना व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला पुष्प अर्पण करीत अभिवादन केले.
लामा म्हणाले, बौध्द टेंपल ॲक्ट १९४९ रद्द करून महाविहाराचा ताबा बौध्दांकडे असावा ही प्रमुख मागणी आहे. हेच या आंदोलनाचे मुळ आहे. आज हे आंदोलन देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर गेले आहेत. बुध्दगयेत कायद्यानुसार लढा सुरू आहे. सध्या महाविहारापासून २ किमी अंतरावर धरणे दिले जात आहे. आता पुन्हा ५ किमी दूर जात आहे. कायद्याचे शांतीपूर्ण पालन होईल. मात्र, ही सरकारने अपरीहार्यता समजू नये, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. २९ तारखेला निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्याही निर्णयासाठी आम्ही तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आकाश लामा यांनी दीक्षाभूमीनंतर ड्रॅगन पॅलेस टेम्पललाही भेट दिली. यावेळी माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी लामा दाम्पत्यांचे स्वागत केले. यावेळी भदंत डॉ. चंद्रकीर्ती व इतर उपस्थित होते.
भंते विनयाचार्यांना तातडीने सोडण्यात यावे
बुध्दगयेत भिक्खूंवर अन्याय होत आहे. भंते विनयाचार्यांना अटक झाली. त्यांना तातडीने सोडण्यात यावे. आंदोलनात फूट पाडण्यासाठी काही अंतर्गत शत्रूही तयार झाले. परंतु, बौध्दांच्या पवित्र स्थळाचा हा मुद्दा असल्याने येथे कुणाच्याही श्रेयाचा विषय नाही. हे सर्वांचे आंदोलन आहे. बुध्दगयेत नेमके काय सुरू आहे, हे देशाला कळावे यासाठी आता बाहेर पडलो आहे. दीक्षाभूमी या पवित्र स्थळापासून यास सुरूवात होत असल्याचे लामा म्हणाले.