नागपूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी गेल्या दीड महिन्यापासून ताटकळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून पुन्हा झटका मिळाला आहे. विद्यार्थ्यांना अलाॅट झालेल्या महाविद्यालयांची यादी २६ जूनला लागणार हाेती. मात्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळात सहाव्यांदा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रक्रिया पुन्हा थांबविण्यात आली. त्यामुळे यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दिवसभर प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. आता ही यादी ३० जूनला लावणार असल्याचे केंद्रीय प्रवेश समितीने जाहीर केले.
गुरुवारी मिळालेल्या महाविद्यालयांची यादी लागणार म्हणून सकाळपासून विद्यार्थी व पालक तयारीत हाेते. साेबतच माध्यमिक शाळांचे प्राचार्य व शिक्षकही यादीच्या प्रतीक्षेत हाेते. वारंवार शिक्षण विभागाचे संकेतस्थळ तपासले जात हाेते. ग्रामीण भागातील विद्यार्थीही पालकांसाेबत यादी पाहण्यासाठी नागपुरात सकाळपासून तळ ठाेकून हाेते. अनेक महाविद्यालयांचे कर्मचारीही शिक्षण उपसंचालक कार्यालयात ताटकळत हाेते. मात्र महाविद्यालयांची यादी दिवसभर जाहीर झाली नाही. दिवसभराचा मन:स्ताप सहन केल्यानंतर सायंकाळी ६ वाजता सर्वांनी परतीचा मार्ग धरला. अनेकांनी याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी यादीबाबत नकारच मिळाला.
सहाव्यांदा बदलले प्रवेशाचे वेळापत्रकदहावीचा निकाल १३ मे राेजी जाहीर झाला. जाहीर झाल्यानुसार अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात आली हाेती. सराव नाेंदणीनंतर २१ मेपासून प्रत्यक्ष नाेंदणी सुरू हाेणार हाेती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खाेळंबली. पुढे २६ मेपासून पुन्हा नाेंदणी सुरू करण्यात आली. ३ जूनपर्यंत असलेली मुदत पुढे ५ जून व नंतर ८ जूनपर्यंत वाढविण्यात आली. ११ व १२ जूनला महाविद्यालयीन काेटा प्रवेश घेण्यात आले. १४ जूनपासून सामान्य प्रवेश सुरू हाेणार हाेते. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया तब्बल १०-१२ दिवस पुढे ढकलली. म्हणजे दहावीच्या निकालाला तब्बल दीड महिना लाेटल्यानंतर आता कुठे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात हाेणार हाेती, पण आता प्रवेश प्रक्रिया पुन्हा रेंगाळली आहे. आता ३० जूनला यादी जाहीर हाेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे सहाव्यांदा वेळापत्रक बदलण्यात आले.
जुलै लागूनही प्रवेश नाही
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला संस्थाचालकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचा विराेध असताना राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण विभागाने कुणाच्याही विराेधाची दखल घेतली नाही. उलट पूर्वी महापालिका हद्दीतील काॅलेज मध्ये सुरू असलेले ऑनलाईन प्रवेश यावर्षी राज्यभरात लागू केले. तांत्रिक व्यवस्था सांभाळणारी सर्व यंत्रणा आहे, की नाही, हे तपासण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. या बेजबाबदारपणाचा फटका आता विद्यार्थी व पालकांनाच भाेगावा लागताे आहे. जुलै महिन्यात महाविद्यालये सुरू हाेणार हाेती. मात्र यावर्षी प्रवेशच झाले नाहीत.