हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कुपोषणाच्या समस्येत वाढ; मातेच्या पोषणाला प्राधान्य देण्याचे 'युनिसेफ'चे आवाहन
By सुमेध वाघमार | Updated: March 25, 2026 17:54 IST2026-03-25T17:53:03+5:302026-03-25T17:54:05+5:30
Nagpur : राज्यात वाढते तापमान, दुष्काळ आणि कृषी क्षेत्रावर वारंवार येणारी संकटे यामुळे कुपोषणाची समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे.

Climate change is increasing the problem of malnutrition in Maharashtra; UNICEF appeals to prioritize maternal nutrition
सुमेध वाघमारे
नागपूर : राज्यात वाढते तापमान, दुष्काळ आणि कृषी क्षेत्रावर वारंवार येणारी संकटे यामुळे कुपोषणाची समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे. सर्वाधिक चिंता गर्भावस्थेतील त्या निर्णायक काळाची आहे, जेव्हा बाळाच्या मेंदूचा पाया घातला जातो; हवामान बदल आणि अपुरा आहार यांचा थेट फटका गर्भवती महिलांना बसत असून त्याचे दीर्घकालीन परिणाम पुढील पिढीवर उमटण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मातेच्या पोषणाला’ सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन युनिसेफने केले आहे.
युनिसेफ-इंडिया आणि केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २५ मार्च रोजी आयोजित एका विशेष क्षमता निर्मिती कार्यशाळेत या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. हवामान बदलामुळे अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत, ज्यामुळे आहारातील वैविध्य कमी होत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील आदिवासी भाग, शहरी झोपडपट्ट्या आणि कृषीप्रधान जिल्ह्यांतील गर्भवती महिलांना बसत असल्याचे निरीक्षण या कार्यशाळेत नोंदवण्यात आले.
बालकांमधील असंसर्गजन्य आजारांचा वाढता धोका
कुपोषणामुळे बाळाच्या जन्मानंतर त्याला आयुष्यभरासाठी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मानसिक आजार जडण्याची भीती असते. याविषयी बोलताना महाराष्ट्रआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी उपकुलगुरू व युनिसेफच्या ज्येष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके म्हणाल्या, जेव्हा एखादी गर्भवती महिला आहारविषयक असुरक्षितता किंवा शारीरिक तणावाला सामोर जाते, तेव्हा केवळ तिच्याच नव्हे, तर तिच्या बाळाच्या संपूर्ण आयुष्यभराच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
हवामानविषयक असुरक्षितता व असंसर्गजन्य आजार हे जोडलेले
सेवाग्राम येथील एमजीआयएमएस संस्थेचे डॉ. सुबोध एस. गुप्ता यांनी स्पष्ट केले की, पोषण, हवामानविषयक असुरक्षितता आणि असंसर्गजन्य आजार हे परस्परांशी जोडलेले आहेत. गर्भधारणेच्या पहिल्या १,००० दिवसांमध्ये हे अत्यंत वेगाने विकसित होतात. या टप्प्यात पोषण कमी पडल्यास भविष्यात लठ्ठपणा आणि टाईप-२ मधुमेहासारखे आजार बळावतात.
राज्यात ६० लाख मुले प्रभावित
राज्यात सध्या बाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजार ही एक मोठी आणीबाणी बनत चालली आहे. पूर्वी केवळ प्रौढांमध्ये आढळणारे मधुमेह, दमा, जन्मजात हृदयरोग आणि स्थूलता यांसारखे आजार आता लहान मुलांमध्ये वेगाने वाढत असून, राज्यातील तब्बल ६० लाखांहून अधिक मुलांवर याचा परिणाम होत आहे. यावर योग्य वेळी उपाययोजना आवश्यक आहेत.
माता व बाल पोषणाची काळजी आवश्यक
पुरावे स्पष्ट आहेत की, गर्भधारणेदरम्यान मातृ पोषणाची काळजी घेणारे आणि पर्यावरणीय ताण कमी करणारे उपाय हे कुपोषण आणि असुरक्षिततेच्या पिढ्यानपिढ्या चालणाºया चक्राला तोडण्यासाठी सर्वात फायदेशीर मार्गांपैकी एक आहे, असे युनिसेफ महाराष्ट्राचे प्रमुख संजय सिंह यांनी सांगितले.
आवश्यक पोषण, सरकारची बांधिलकी
पत्र सूचना कार्यालयाच्या (पश्चिम विभाग) महासंचालिका स्मिता वत्स-शर्मा यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आजची कार्यशाळा या पुराव्यांना कृतीत रूपांतरित करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. देशातील प्रत्येक गर्भवती महिलेला, विशेषत: आदिवासी आणि ग्रामीण समुदायांमध्ये, आवश्यक पोषण व निगा मिळवून देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे.