बावनकुळे म्हणाले... एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 14:01 IST2021-11-12T12:17:13+5:302021-11-12T14:01:05+5:30
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकाला आंदोलनस्थळी भेट दिली. सरकारने योग्य ती कारवाई करून कर्मचाऱ्यांचे प्रश्नासंबंधी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

बावनकुळे म्हणाले... एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार!
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्यांच्या संपाला समर्थन देण्याकरता भाजप नेते व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गणेशपेठ बस स्थानकातील आंदोलनस्थळी भेट दिली. व सरकारने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी तोडगा काढावा, अशी मागणी केली.
एसटी कर्मचारी हे आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु, या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केले जात आहे. सरकारच्या चुकीच्या वागणुकीमुळेच काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून या सर्वाला हे सरकारच जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मुंबईतील आझाद मैदानावर रात्रभर थंडीत लोकं बसून आहेत. मात्र, मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असून कुणीही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे आलेलं नाही. मात्र, आमचा या संपाला पाठिंबा असून त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागीही झालो आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करू, असे बावनकुळे म्हणाले.
यासोबतच, कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, आत्महत्या हा काही पर्याय नाही असे आवाहनही त्यांनी यावेळेस केले. सरकारनेही आणखी लोकांच्या आत्महत्येची वाट पाहू नये, त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर आणू नये. काय समिती नेमायची ती नेमावी व त्यांचं समाधान होईल आणि हे आंदोलन मागे कसे घेता येईल, अशी कारवाई करावी अशी भावना बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली.