तणनाशक धोकादायक, तर कीटकनाशक नाही का? शेतकऱ्यांना सरकारच्या बंदीचा फटका
By सुनील चरपे | Updated: June 16, 2025 14:31 IST2025-06-16T14:30:52+5:302025-06-16T14:31:45+5:30
कॅन्सर होत असल्याचा दावा : पर्यावरणासाठी धोकादायक कोण? तणनाशक की सरकारचे धोरण?

Are herbicides dangerous, but pesticides not? Farmers hit by government ban
सुनील चरपे
नागपूर : राज्य सरकारने कापसाचे तणनाशक सहनशील बियाणे विक्री व वापर यावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे. तणनाशक पर्यावरणाला हानीकारक आहे, असा दावा सरकारने केला आहे. या बियाण्यांची विक्री व वापर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठविले जाते. शेतकरी तणनाशकांचा वापर पिकातील तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी करतात. याच्या वापरामुळे मोठी झाडे किंवा झुडपे नष्ट होत नाही.
उलट, कीटकनाशकांमुळे फुलपाखरे, मधमाश्यांसह इतर मित्रकिडीच नव्हे तर माणसेदेखील मरतात. मग तणनाशकांच्या तुलनेत कीटकनाशकांमुळे पर्यावरण जैवविविधतेला धोका उद्भवत नाही का? पिकांची बियाण्याचा व तणनाशकाचा आपसात संबंध नाही. एचटीबीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये बॅसिलस थुरिंगिएन्सिस जनुकासोबतच हर्बिसाइड टॉलरन्ट जनुके टाकलेली असतात. त्यामुळे एचटीबीटी कापसाच्या पिकात ग्लायफोसेट व इतर तणनाशकांची फवारणी केल्यास पीक सुरक्षित राहात असून, तण नष्ट होते. केंद्र सरकारने एचटीबीटी कापसाच्या बियाण्यांवर बंदी घातली असली तरी गुजरात व तेलंगणामध्ये या बियाण्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी या बियाण्याला प्राधान्य देतात. एचटीबीटी कापूस वगळता बीटी कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर या व इतर पिकांच्या बियाण्यांमध्ये हर्बिसाइड टॉलरन्ट जनुके टाकलेली नसतात. या पिकांमधील तणांचे व्यवस्थापन करण्यासाठी निवडक तणनाशके बाजारात उपलब्ध असून, शेतकरी त्यांचा नियमित वापर करतात. या बियाणे व तणनाशकांच्या उत्पादन व वापरावर केंद्र व राज्य सरकारने बंदी घातलेली नाही. यात वादग्रस्त ग्लायफोसेटचाही समावेश आहे.
ग्लायफोसेटला विरोध
भारतीय पर्यावरणवाद्यांचा खरा विरोध आहे तो ग्लायफोसेट या तणनाशकाला! याचा आणि बियाण्याचा काहीही संबंध नाही. भारतात ग्लायफोसेटचे उत्पादन व वापर यावर बंदी नाही. सरकार एचटीबीटी कापूस बियाणे तसेच तणनाशके उत्पादक कंपन्यांवर कुठलीही कारवाई करीत नाही. तुरुंगात टाकले जाते ते एचटीबीटी कापूस बियाणे विक्रेते व शेतकऱ्यांना !
कॅन्सर होत असल्याचा दावा
तणनाशकांच्या वापरामुळे माणसांना कॅन्सर होत असल्याचा दावा पर्यावरणवादी, काही नेते व अधिकारी करतात. जगात ग्लायफोसेटचा वापर ७० वर्षांपासून केला जात आहे. तणनाशकांची सतत फवारणी करणाऱ्या सात कोटी लोकांपैकी एकास स्किन कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण होते, असेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे. जगात आजवर केवळ दोन व्यक्तींनी त्यांना तणनाशक फवारणीदरम्यान स्किन कॅन्सर झाल्याचा दावा करीत न्यायालयात दाद मागितली. ते दोघेही अमेरिकन आहेत. डब्ल्यूटीओने कॉफी आणि ग्लायफोसेटला एकाच कॅटेगरीत समाविष्ट केले आहे.
वैध व अवैध वृक्षतोड
विकास कामांसह इतर बाबींसाठी सरकारने अलीकडच्या काळात संपूर्ण देशातील कोट्यवधी झाडे वैध व अवैधरीत्या तोडली आहेत. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण १.२९ गीगाटनने वाढल्याने तापमानात वाढ झाली. याचे परिणाम शेतातील मातीपासून तर पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांना भोगावे लागत आहे. मग या बाबी पर्यावरणाला धोकादायक नाहीत काय ?