युएई एक अकल्पित झेप
By Admin | Updated: December 31, 2016 13:14 IST2016-12-31T12:42:29+5:302016-12-31T13:14:27+5:30
अत्युच्च दरडोई उत्पन्न, मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा, शिवाय करमुक्त देश! एका मुस्लीम अरब देशाला - जो राजेशाही आणि शेखीची व्यवस्था जपून आहे - हे कसं आणि का जमलं? ही फक्त तेलाच्या पैशाची जादू आहे, की त्यात राष्ट्र निर्माणाची गुरुकिल्ली दडली आहे?

युएई एक अकल्पित झेप
- अनवरत भूमंडळी
- ज्ञानेश्वर मुळे
ड्रायव्हरनं खिडकीतून बाहेर हात दाखवून सांगितलं, ‘सर, यही आपका होटल है.. हयात कॅपिटल गेट.’
- मी त्यानं दाखवलेली इमारत पाहिली आणि थक्क झालो. पस्तीसेक मजल्यांची ती इमारत, सर्वसाधारण इमारतींसारखी थेट सरळ रेषेत आकाशात न जाता चक्क कमरेत वाकून उभी होती. काखेत कळशी घेऊन चालणारी स्त्री जशी कमरेत वाकलेली असते, तशीच. अद्भुत वाटली मला. सरळ उंच जाणाऱ्या इमारतीतले काही मजले मोकळे ठेवणं वेगळं, इथं तर सगळी इमारतच पिसाच्या मनोऱ्यासारखी झुकलेली होती.
मी खोलीत प्रवेश करताच सर्वप्रथम वायफाय इंटरनेट सुरू करून ‘हयात कॅपिटल गेट हिस्ट्री’ असा परवलीचा शब्द टाकला आणि गुगळे मास्तरांनी त्या इमारतीवर प्रकाश टाकणारे धागे अन् अनेक रहस्य उलगडणारी माहिती समोर फेकली.
३५ मजल्यांचं १६० मीटर उंचीचं हे हॉटेल जमिनीपासून पश्चिमेकडे १८ अंश झुकलेलं आहे. इटली, चीन, भारत या देशांपासून युरोप आणि अमेरिका खंडात सर्वत्र अशा कलत्या इमारती आहेत. भारतात संबलपूरजवळ ‘हमा’ मंदिर (ओडिशा) आणि एट्टुमनूर इथला ‘सुवर्ण स्तंभ’ यांचा अशा यादीमध्ये समावेश आहे. हमा मंदिर प्रेक्षणीय आहे आणि त्याचं कलणंसुद्धा. मॉँट्रियलमध्ये आॅलिम्पिक स्टेडियमचा १७५ मीटर उंचीचा मिनार हा सगळ्यात उंच झुकलेला मिनार आहे. जर्मनीतल्या सरूसेनमधल्या चर्चचा सन्मान २००७ मध्ये गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने केला. हे चर्च पिसाच्या ३.९७ अंशाच्या मानानं ५.१ अंश झुकलेलं आहे. अबुधाबीतल्या कॅपिटल गेट इमारतीने जगातल्या सगळ्यात जास्त कललेल्या इमारतीचा सन्मान, या चर्चकडून खेचून घेतला आणि तो आशिया खंडाला दिला. महत्त्वाचा मुद्दा असा, की त्या चर्चचं कलणं हे त्या चर्चच्या पायाभूत दुर्बलतेमुळे (पायातलं लाकूड सडल्यानं) घडलं, तर कॅपिटल गेटचं कलणं हे अभियंत्याच्या कुशलतेचं प्रतीक आहे. विज्ञानाच्या नियमांना झुगारून त्याविरु द्ध जाऊ पाहणाऱ्या माणसाच्या सकारात्मक युयुत्सू वृत्तीचं ते उत्तम उदाहरण आहे.
एका मुस्लीम अरब देशाला - जो राजेशाही आणि शेखीची व्यवस्था जपून आहे - हे कसं जमलं? स्वतंत्र भारताच्या ७० वर्षांच्या इतिहासात स्थापत्यातले नवे आश्चर्यकारक मानदंड निर्माण करणं भारतासारख्या प्रचंड बुद्धिवान देशाला का जमलं नाही? हे फक्त युनायटेड अरब अमिरातीला तेलाच्या पैशांमुळे शक्य झालं, की त्या पाठीमागेही राष्ट्र निर्माणाची काही गुरुकिल्ली दडली आहे? त्या कलत्या इमारतीत मला देशाच्या प्रगतीचंच नाही, तर अवकाशस्पर्श उत्तुंग भरारीचं दर्शन घडलं.
एकेकाळी इंग्रज लोक अबुधाबीच्या छोट्या विमानतळाचा वापर भारतात येण्यासाठी मुक्कामाचा थांबा म्हणून करत. त्या भारतातलेच २८ लाख लोक रोजगारासाठी या देशात आले आहेत आणि त्यांची संख्या स्थानिक लोकसंख्येच्या अडीचपट आहे. याचं कारण काय? बसल्या उठल्या आपण ‘आत्ताच दुबईहून आलो’ असं सहजासहजी म्हणतो. त्यातून एक जनसमूह म्हणून दुबईविषयी केवढं आकर्षण आपल्याला आहे ते लक्षात येतं. याच्यामागचं रहस्य काय? गुरुत्वमध्याला झुगारून कललेल्या त्या इमारतीप्रमाणेच आणखी कोणत्या निसर्गनियमांना किंवा पदार्थविज्ञानातल्या तत्त्वांना या देशानं आव्हान दिलं आहे?
खरंतर या प्रश्नाचं उत्तर या देशात सर्वत्र आढळतं. वाळवंटी प्रदेश असूनही लाखो लोक राहतील अशी शहरं त्यांनी बांधली आणि सर्वांना पाण्याची सोय मुबलक प्रमाणात उपलब्ध केली. समुद्राचं पाणी वापरून पिण्याचं पाणी निर्माण केलं. जिथं शक्य आहे तिथं समुद्राला वळवून, आकार देऊन, खाडीत माती भरून त्यावरती उत्तम उपनगरं, इमारती, रस्ते आणि बागा निर्माण केल्या. तेलाशिवाय काहीही नसलं तरी तेल सोडूनही सगळं इथं आहे. उंचच उंच आकर्षक इमारती, मनोरंजनाचे वेगवेगळे पार्क, वाळवंटातली आकर्षणं, समुद्रकिनारे, उंची हॉटेल्स, जगातली मोठी कृत्रिम बंदरं, पर्यटनासाठीची आकर्षणं, एवढंच नव्हे तर उत्सवांचा अभाव म्हणून ‘शॉपिंग फेस्टिव्हल’. दुबईच्या स्थावर मालमत्तेत भारतीयांची ५०-६० बिलियन डॉलर म्हणजे साधारण ३-४ लाख कोटी रु पयांची गुंतवणूक असावी. थोडक्यात काय, जिथं कुणी जायलाही तयार नव्हतं ४० वर्षांपूर्वी त्या देशानं तुम्हा-आम्हाला वेड लावलंय.
आपली भारतीयांची एक गंमत आहे. कुणीही अमुक देश आपल्यापेक्षा चांगली प्रगती करतोय म्हटलं की आपण पटापट सबबी सांगतो किंवा स्पष्टीकरणं देतो किंवा त्या व्यवस्थेतली वैगुण्यं दाखवतो. शिवाय ‘आम्हीही एकेकाळी......’ वगैरे ऐकवतो. तसं न करता ज्या देशांनी प्रगती केली आहे, त्यांच्या प्रगतीचं रहस्य आपण समजून घेऊ या. कान्टॉस या आॅस्ट्रेलियन विमान कंपनीला ‘एमिरट्स’ या विमान कंपनीशी स्पर्धा जमली नाही. त्यांनी ‘एमिरट्स’बरोबर समझोता केला. आज ‘एमिरट्स’नं इटालियन अलिटालियाचे ४९ टक्के रोखे विकत घेतले आहेत. कारण या देशाला हे केव्हाच कळलं आहे की तुम्ही आकाश काबीज केलंत की सगळं जग्ग थक्क होऊन बघत राहतं.
काहीही नसणाऱ्या या देशाने आज अत्युच्च दरडोई उत्पन्न, मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा आणि करमुक्त देश उभा केला आहे. याचं कारण या देशानं गुरुत्वाकर्षणाच्या विरु द्ध दिशेनं जाणाऱ्या उंचच उंच इमारतीच उभ्या केल्या नाहीत, तर भूगोल, इतिहास आणि निसर्गनियमांनी तयार केलेली सगळी बंधनं तोडली आहेत. मोठ्या प्रकल्पांचं अचूक सरकारी नियोजन आणि अंमलबजावणी, विदेशी जनतेचं आणि परदेशी गुंतवणुकीचं मोकळेपणानं स्वागत, देशहिताला आवश्यक अशी प्रशासन व्यवस्था.
म्हणूनच ९२ लाख लोकसंख्येपैकी या देशात ७८ लाख विदेशी लोक आहेत. यापैकी २८ लाख भारतीय, १२ लाख पाकिस्तानी, ५ लाख बांगलादेशी, तर ३ लाख श्रीलंकन आहेत.
एकेकाळी भारतीय रुपया चलन असलेल्या युनायटेड अरब अमिरातीनं गुरुत्वमध्यालाच छेद देऊन एक अकल्पित झेप घेतली आहे.
(समाप्त)
(लेखक भारतीय परराष्ट्र सेवेतील वरीष्ठ अधिकारी आहेत.)
dmulay58@gmail.com