देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 22:02 IST2026-01-12T22:01:51+5:302026-01-12T22:02:48+5:30
BMC Elections 2026 : महायुतीची आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरें बंधूंवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
BMC Elections 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज (सोमवारी) महायुतीची शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली. काल याच शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा झाली होती. या सभेमध्ये ठाकरें बंधूंनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. आजच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. यावेळी फडणवीस यांनी व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या टीका दाखवल्या.
"महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. त्यांनी हिंदू संस्कृती आणि भगवा झेंडा जगात नेला. कधी कधी मी विचार करतो इतक्या सभा घेण्याची गरज आहे. पण माझ्यासाठी तो संवाद असतो. काही गोष्टी या संवादापेक्षा वेगळ्या संवादात बोलावे लागतो. मी त्यांच्याच शब्दात सांगतो, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ लावला. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याचे दाखवले तर कधी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याचे दाखवले.
"दुसऱ्याची लेकरं स्वत:च्या मांडीवर खेळवता म्हणता, तुम्ही माझ्या आई-वडिलांवर बोललात. उद्धव ठाकरे लाज वाटली पाहिजे, मी तुमच्या कुटुंबियांवर टिका करणार नाही, माझ्यावरती ते संस्कार नाहीत. माझं ठीक आहे, पण तुमचे वडिल बघत असतील तर काय बोलत असतील जेव्हा तुम्ही रशीदमामूला सोबत घेऊन आहात, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी ठाकरेंना दिले.
"मुंबईचे विमानतळ यांना विकायचं आहे, म्हणून नवी मुंबईतील विमानतळ सुरू होत आहे. तुम्ही मातोश्री १ वरुन मातोश्री २ वर गेले, राज ठाकरे कृष्णकुंज वरुन शिवतीर्थवर गेले. कारण, तुम्हाला जागा पुरत नाही. मग, गेल्या २५ वर्षांपासून नवी मुंबईत विमानतळ करायची मागणी होती, पण तुम्ही काहीच केले नाही. आमची सरकार आल्यावर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती दिली. आता, आम्ही तिसरे विमानतळही मुंबईत करतोय, याची घोषणा करतो, असेही फडणवीस म्हणाले.