‘शौर्यगाथा’..भारतभूमीच्या एका लढवय्या 'वीरपुत्रा'ची..!  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 11:44 AM2020-07-18T11:44:51+5:302020-07-18T11:47:32+5:30

१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धावेळी बाँम्बचे तुकडे त्यांच्या पायात, पाठीत, मणक्यात घुसले, ते जखमी झाले तरीदेखील त्या अवस्थेतही ते लढत राहिले.

The Story of fighter soldiers of India .. | ‘शौर्यगाथा’..भारतभूमीच्या एका लढवय्या 'वीरपुत्रा'ची..!  

‘शौर्यगाथा’..भारतभूमीच्या एका लढवय्या 'वीरपुत्रा'ची..!  

Next
ठळक मुद्दे१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय कामगिरी

- निनाद देशमुख 

... ही गोष्ट आहे १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धाची. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यांनी थेट लाहोरवर हल्ला चढविला. भारतीय रणगाड्यांनी पाकिस्तानी सैन्यांचा धुव्वा उडवला. लाहोर जवळ असतांना एक महत्त्वाचा संदेश इतर रणगाड्यांपर्यंत युद्धभूमीत पोहचवायचा होता. मात्र, पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्यात भारतीयांची दूरसंचार यंत्रणा खराब झाली. मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव होत असतानाही हा संदेश कमांडिंंग ऑफिसरपर्यंत पोहचविणे गरजेचे होते. यावेळी एका रणगाड्याची धुरा सांभाळणारे महाराष्ट्राचे वीर पी.व्ही सरदेसाई पुढे आले. प्रचंड बॉम्ब वर्षावात त्यांनी रणगाड्यातून बाहेर येत हा महत्त्वाचा संदेश कमांडिंंग ऑफिसर पर्यंत पोहचवला. मात्र, परतत असताना एक बॉम्ब त्यांच्याजवळच फुटला. यात ते जखमी झाले. अशा अवस्थेतही त्यांनी शत्रुवर हल्ला केला आणि भारतीय रणगाड्यांना शत्रुच्या माऱ्यापासून वाचवले.
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले मेजर जनरल पी. व्ही सरदेसाई यांचे नुकतेच निधन झाले. मणक्यात बॉम्बचे तुकडे गेले असले तरी त्यांनी ते न काढता प्रदीर्घ लष्करी सेवा बजावली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पदकांनी गौरविण्यात आले.  पी.व्ही. सरदेसाई यांचा जन्म २ डिसेंबर १९३९ मध्ये पुण्यात झाला. लहानपणापासून ते चाणाक्ष होते. त्यांचे शिक्षण हे पुण्यातील मॉर्डन हायस्कूलमधून पूर्ण झाले. घरी लष्करी पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे वडील विद्याधर नरहर सरदेसाई हे आयसीएस अधिकारी होते. तत्कालीन बॉम्बे प्रेसिडन्सीचे ते मुख्य सचिव होते.  त्यांचे आजोबा नरहर गोपाळ सरदेसाई हे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे संस्थापक होते. घरात येवढी मोठी पार्श्वभूमी असताना, त्यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.  त्यांनी जिद्दीने अभ्यास करत १९५६ साली अतिशय कठीण असलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची(एनडीए) परीक्षा उत्तीर्ण केली. तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी लष्करात रणगाड्यांच्या तुकडीत जाण्याचे ठरवले. एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १९६०ला ते कॅप्टन पदावर लष्करात रूजु झाले. आर्मड रेजिमेंटमध्ये ते सेंट्रल इंडिया हॉर्स बटालियनमध्ये दाखल झाले. त्यांची पहिली पोस्टींग ही झाशी येथे झाली. त्यानंतर त्यांची बदली जम्मु काश्मीरमध्ये झाली. या  ठिकाणी पाकिस्तानकडून झालेल्या घुसखोरीचा प्रयत्न त्यांनी उधळून लावला होता. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शौर्यपदक बहाल करण्यात आले होते.    

१९६५ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. भारतापासून काश्मीरला वेगळे करण्याच्या हेतूने पाकिस्ताने नियंत्रण रेषा ओलांडून भारतावर हल्ला केला. काश्मीरमध्ये आघाडी मिळवल्यावर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराने दुसरी आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला. यात थेट लाहोरवर हल्ला करायचे ठरले. भारतीय लष्कराने जोरदार आघाडी उघडत नियंत्रण रेषा ओलांडली. पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा उडवत भारतीय फौजा लाहोर पर्यंत पोहचल्या होत्या. यावेळी कॅप्टन पी.व्ही. सरदेसाई यांची टँक रेजिमेंन्ट पाकिस्तानच्या बुकारी गावाजवळ होती. भारतीय सैन्य हुडीयार या गावाजवळ होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या आर्टीलरीकडून भारतीय सैैन्यावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव होत होता. अशा परिस्थितीतही भारतीय रणगाडे पाकिस्तानी सैन्याला नामोहरम करत होते. भारतीय रणगाडे पुढे जात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एक महत्त्वाचा संदेश आला. बॉम्ब वर्षावात भारतीयांची संपर्क व्यवस्था तुटली होती. सरदेसाई यांच्या रणगाड्यात असलेल्या रेडियो संचावर हा महत्त्वाचा संदेश आला. तो संदेश कमांडिंंग ऑफिसरला देणे गरजेचे होते. मात्र, त्यांच्याकडे तो पोहचवता येत नव्हता. यावेळी त्यांनी जीवाची पर्वा न करता रणगाड्यातून उतरत हा संदेश पोहचविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी रणगाड्यातून उतरताच त्यांच्यावर प्रचंड बॉम्ब वर्षाव झाला तरीदेखील त्यांनी तो संदेश कमांडिंंग ऑफिसरला दिला. परत येत असताना एक बॉम्ब त्यांच्याजवळ फुटला. बाँम्बचे तुकडे त्यांच्या पायात, पाठीत, मणक्यात घुसले, ते जखमी झाले तरीदेखील त्या अवस्थेतही ते लढत राहिले.
यानंतर त्यांना फिरोजपुर येथे आणण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या शरिरातील बॉम्बचे तुकडे काढण्यात आले. मात्र, मणक्यात खोलवर रूतलेले बॉम्बचे तुकडे डॉक्टरांना काढता आले नाही. ते तुकडे काढले असते तर त्यांना अर्धांगवायू झाला असता. काही दिवस त्यांच्यावर दिल्ली येथील लष्कराच्या रूग्णालयात उपचार करण्यात आले. आणि त्यानंतर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. येथे ते बरे झाले. मात्र, बॉम्बचे तुकडे आयुष्यभर त्यांच्या पाठीत राहिले. ते बरे झाल्यानंतर पुन्हा लष्करात रूजू झाले. १९७१ मध्ये त्यांना पुन्हा युद्धात लढण्याची संधी आली होती. मात्र, ते युद्धभूमीवर जाण्याच्या आधीच युद्ध संपले.
यानंतर त्यांनी रणगाड्याचे सखोल प्रशिक्षण पूर्ण केले. लष्कराच्या वाहनांच्या क्वालिटी अशुरंन्स विभागाचे ते प्रमुख झाले. त्यांचा रणगाड्याच्या युद्धतंत्राचा अनुभव बघता अनेक लष्करी अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. १९७९ मध्ये भारताने त्यांना नायजेरिअन लष्कराच्या टँक रेजीमेंन्टला प्रशिक्षण देण्यासाठी पाठवीले. लष्करात त्यांनी बजावलेल्या प्रदीर्घ सेवेत त्यांना अनेक पदकांनी भूषविण्यात आले. भारतीय लष्करासाठी वाहने बनविणाऱ्या क्वालिटी अशुरंन्स ऑफ व्हेईकल विभागाचे ते प्रमुख झाले. १९९६मध्ये मेजर जनरल पदावरून ते निवृत्त झाले. त्यांच्या लष्करी जीवनात त्यांनी बजावलेल्या सेवेचा भारत सरकारने अनेकदा गौरव केला.  निवृत्त झाल्यावरही ते कधी स्वस्थ बसले नाहीत. त्यांना बागकामाचा आणि वाचनाचा छंद होता. तो त्यांनी कायम जपला. या सोबतच त्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ज्ञानदानाचेही काम केले. त्यांच्या सारखा लढवय्या योद्धा पुन्हा होणे नाही.


 

Web Title: The Story of fighter soldiers of India ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.