नाना फडणवीसांची अधुरी मुत्सद्देगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 07:00 AM2019-10-20T07:00:00+5:302019-10-20T07:00:04+5:30

ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमाचा इतिहास

Incomplete diplomacy of Nana Fadnavis | नाना फडणवीसांची अधुरी मुत्सद्देगिरी 

नाना फडणवीसांची अधुरी मुत्सद्देगिरी 

googlenewsNext

* प्रसिद्ध इंग्रजी लेखक विल्यम डेलरिम्पल यांच्या ‘द अनार्की’ या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच झाले. भारतीय इतिहासातून दुर्लक्षित राहिलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या काळावर आधारित असलेल्या ग्रंथात त्यांनी तत्कालीन भारतीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमाच्या कहाण्या पुढे आणल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय समाजव्यवस्थेचे चित्रण करून मूठभर इंग्रजांनी भारतासारख्या खंडप्राय देशावर राज्य कसे केले याचा लेखाजोखाही मांडला आहे. प्रकाशनानिमित्त पुण्यात आले असताना डेलरिम्पल यांच्याशी साधलेला संवाद...

- अविनाश थोरात -  

''भ्रष्टाचाराचा पहिला पाठ ईस्ट इंडिया कंपनीकडूनच...''
समकालीन संदर्भात बोलताना विल्यम डेलरिम्पल म्हणाले, मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा धोका ईस्ट इंडिया कंपनीच्या उदाहरणावरून ओळखला पाहिजे. १६९७ मध्ये ब्रिटिश संसदेतील खासदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी लाच देण्यात आली. यावरून भ्रष्टाचाराचा पहिला पाठही ईस्ट इंडिया कंपनीनेच दिला, हे ओळखले पाहिजे. वेगवेगळ्या शेल कंपन्या तयार करून ‘इनसाईड ट्रेडिंग’मधून क्लाईव्ह लॉईडने मोठे नफा कमाविला होता. 


''जीडीपी जास्त, पण दरडोई उत्पन्न कमी...''
मोगलांच्या काळात भारताचा जीडीपी खूप चांगला होता. कारण हिरे, रेशीम, मसाल्याचे पदार्थ यांची निर्यात होत होती. पण त्या काळात संपत्तीचे केंद्रीकरण झालेले होते. प्रचंड विषमता निर्माण झाली होती. करव्यवस्था अत्यंत जुलमी होती. याचा फायदा ईस्ट इंडिया कंपनीने घेतला. 

ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिशांचा धोका भारतात सर्वात प्रथम नाना फडणवीस यांनी ओळखला होता. पेशवाईमध्ये आणि तत्कालीन भारतातही नानांइतका बुद्धिवान माणूस नव्हता. हैदराबादचा निजाम, म्हैसूरचा टिपू सुलतान आणि मराठे यांची तिहेरी आघाडी करून वडगावच्या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचा पराभवही त्यांनी केला होता. मराठे घाट ओलांडून मुंबईपर्यंत पोहोचले असते आणि टिपूने मद्रासपर्यंत दौड मारली असती तर शक्तिहीन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य त्याच वेळी संपले असते.


भारतीय उपखंडातील इंग्रज काळाचे अभ्यासक असलेले ज्येष्ठ लेखक विल्यम डेलरिम्पल सांगत होते. ब्लूम्सबेरी प्रकाशनातर्फे ‘द अनार्की’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. तब्बल सहा वर्षे इस्ट इंडिया कंपनीच्या इंग्लंड आणि भारतातील उपलब्ध कागदपत्रांचा अभ्यास करून त्यांचा हा ग्रंथ साकार झाला ‘घाशीराम कोतवाल’सारख्या नाटकातून नाना फडणवीस यांची एक प्रतिमा तयार झाली. पण ईस्ट इंडिया कंपनीच्या १५२८ पासूनच्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर त्यांना तत्कालीन भारतीय राजकारणातील तीन जणांनी भारावून टाकले. दिल्लीचा बादशहा शाह आलम, म्हैसूरचा टिपू सुलतान आणि पेशवाईतील नाना फडणवीस हे ते तिघे. त्यातही नाना फडणवीसांबद्दल ते अगदी भरभरून बोलतात. मुत्सद्देगिरीमध्ये भारताचा मॅकवली म्हणावे असे नाना फडणवीस यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा धोका ओळखला असल्याचे सांगताना ते म्हणतात, वडगाव मावळ येथील युद्धस्थळाला मी भेट दिली आहे. मराठा सैन्याने इंग्रजांचा येथील लढाईत पराभव केला. त्याच वेळी पोलिलूर येथील लढाईत टिपू सुलतानने ईस्ट इंडिया कंपनीला हरविले होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात निजाम, टिपू सुलतान यांची आघाडी करण्याची कल्पना नाना फडणवीस यांची होती. मात्र, आपण मिळविलेल्या यशाचा अंदाज या दोघांनाही आला नाही. आणखी पुढे त्यांनी चढाई केली असती तर कंपनीची सत्ता त्याच वेळी संपली असती. कदाचित त्यामुळे भारताचा इतिहासही बदलला असता. नानांचा अंदाज चुकलाच; पण त्यांच्यापुढे शिंदे-होळकरांत सुरू झालेल्या अंतर्गत गृहयुद्धाचीही डोकेदुखी होती. नानांची अनोखी युद्धनीती वाया गेली. 
ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमांची कहाणी असलेला ‘द अनार्की’ हा ग्रंथ ‘द व्हाइट मुगल्स’ या त्यांच्या ग्रंथाचा पुढचा भाग आहे. यामध्ये १८०३ पर्यंतचा काळ चितारला आहे. पण हा काळ एक इंग्रज म्हणून नव्हे तर स्कॉटिश म्हणून त्यांनी मांडला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठपणाही आला आहे. याचे कारण सांगताना डेलरिम्पल म्हणाले , ‘‘आम्ही स्कॉटिश लोकांनी एकाच वेळी वसाहत म्हणून यातना भोगल्या आणि साम्राज्यवादीही होतो. त्यामुळेच त्यांच्या या पुस्तकावर इंग्लंडमध्ये टीका झाली.’’ हा सगळा इतिहास मांडताना त्यांनी हजारो कागदपत्रांचा अभ्यास केला. यातून ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलुमाच्या अनेक कहाण्या त्यांना दिसल्या. बंगालच्या दुष्काळात लोक अन्नासाठी टाचा घासून मरत असताना कंपनीचे शिपाई सारा गोळा करण्यासाठी जनतेवर अत्याचार करत होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या क्रूर आणि निर्दयी वागणुकीचा इतिहास आत्तापर्यंत पुढे आला नव्हता. याचे कारण म्हणजे भारतीयांनाही आपल्या गौरवशाली इतिहासातच रमण्याची सवय आहे. ईस्ट इंडिया कंपनीचा काळ म्हणजे भारतासाठी अंधारयुगच होते. याचे एकच उदाहरण म्हणजे मोगल काळात एकूण जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा ३० टक्क्यांपेक्षा अधिक होता. कंपनीच्या काळात तो दोन टक्क्यांपर्यंत घसरला. हे सगळे झाले याचे कारण म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ही केवळ नफा कमाविण्यासाठीच भारतात आली होती. इंग्लंडच्या शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली ही कंपनी आपले संचालक आणि भागीदारांनाच जबाबदार होती. त्यामुळे फायदा कमाविण्यासाठीच ते काम करत होते. विशेष म्हणजे यासाठी भारतातील एत्तद्देशियही त्यांना मदत करत होते. 
एका छोट्या देशातील एक कंपनी. परंतु, भारतासारख्या खंडप्राय देशावर तिने कब्जा मिळविला. केवळ २०० इंग्रज भारतात होते. हे सगळे कसं घडलं? याचे कारण म्हणजे कंपनी भारतीय राजकारणात लुडबूड सुरू केली त्याअगोदर खूप मोठा अनुभव होता. १५२८ मध्येच कंपनी भारतात आली. इंग्लंडमधील अत्यंत बुद्धिमान तरुण कंपनीच्या नोकरीत होते. विशेष म्हणजे सोळाव्या वर्षी एखादा अधिकारी भारतात आल्यावर त्याला वयाच्या चाळिशी- पंचेचाळिशीपर्यंत इंग्लंडला परत जाता येत नव्हते. त्यामुळे येथील भाषा, चालीरीती, राजकारण त्यांनी समजून घेतले.

सामाजिक व सांस्कृतिक पातळीवर ते लोकांमध्ये मिसळले होते. ते नवाबांप्रमाणे राहत. या सगळा लूट आणि फायदा कमावण्यात भारतीयांनी त्यांना  मदतच केली. याचे कारण म्हणजे त्या वेळी मोगल साम्राज्याचे पतन झाले होते. वेगवेगळ्या राजवटींत भारत विभागला गेला होता. येथील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पूर्णपणे बिघडली होती. याचे उदाहरण म्हणजे मराठा फौजांच्या सततच्या लुटीमुळे बंगालमधील हिंदू भद्र लोकही त्यांच्या विरोधात होते. कदाचित आजच्या काळात फितुरी वाटेल, परंतु त्यांच्यासाठी सुरक्षेचा प्रश्न होता. त्यामुळे या भद्र लोकांनी इंग्रजांना साथ दिली. व्यापाºयांनी इंग्रजांना निधी पुरविला. त्यामुळे तब्बल २ लाखांचे खडे सैन्य तयार करणे इंग्रजांना शक्य झाले. कोलकता, बनारस, पाटणापर्यंतच्या हिंदू बॅँकर्सनी त्यांना साथ दिली होती. 
ब्रिटिश राजवट भारतासाठी हितकारी ठरली, असे मानणाºयांचाही एक वर्ग आहे. यावर डेलरिम्पल म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की भारतावर खºया अर्थाने ब्रिटिशांचे राज्य केवळ ९० वर्षे होते. त्याअगोदरच शंभर वर्षे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. त्यांना सामाजिक सुधारणांमध्ये काहीही रस नव्हता. केवळ फायदा कमवायचा होता.  इंग्रजी राजवट मात्र यापेक्षा वेगळी होती. ते किमान सामाजिक सुधारणा आणण्याचे बोलत होते. शाळा, कॉलेजे सुरू करत होते. मात्र, तरीही एकंदर पाहिले तर ही राजवट वर्णद्वेषीच होती. 'कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश नाही' असे फलक ते लावत.  

(लेखक लोकमतच्या पुणे आवृत्तीमध्ये वृत्तसंपादक आहेत)
 

Web Title: Incomplete diplomacy of Nana Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे