राज्यात वणव्यांचा कहर ! १२ हजार हेक्टर वनक्षेत्र जळून खाक ; एका वर्षात १६ हजार घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:49 IST2026-04-07T12:45:46+5:302026-04-07T12:49:40+5:30
Amravati : महाराष्ट्रातील वनसंपदेला वणव्याचा शाप लागला असून, गेल्या वर्षभरात २०२३-२४ मध्ये राज्यातील तब्बल १२,००३ हेक्टर वनक्षेत्र आगीच्या विळख्यात सापडले आहे.

Wildfires wreak havoc in the state! 12 thousand hectares of forest area burnt; 16 thousand incidents in a year
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :महाराष्ट्रातील वनसंपदेला वणव्याचा शाप लागला असून, गेल्या वर्षभरात २०२३-२४ मध्ये राज्यातील तब्बल १२,००३ हेक्टर वनक्षेत्र आगीच्या विळख्यात सापडले आहे. वन विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात वणव्याच्या एकूण १६,००८ घटनांची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जगाने विझवण्यासाठी आधुनिक 'हेली-टैंकर्स' आणि ड्रोनचा वापर सुरू केला असताना, राज्यात वन कर्मचारी मात्र आजही झाडांच्या फांद्यांनी आग विझवताना स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.
वन सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, गडचिरोली जिल्हा वणव्याच्या बाबतीत देशात अग्रस्थानी राहिला आहे. २०२३-२४ या हंगामात एकट्या गडचिरोलीत ७,०४२ आगीच्या घटनांची नोंद झाली. त्या खालोखाल ठाणे, कोल्हापूर आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प (अमरावती) या आहे. भागांना वणव्याचा मोठा फटका बसला वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पुनरुत्पादन थांबले असून, जमिनीतील सूक्ष्म जीव आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. यंदा फेब्रुवारीपासून वणव्याच्या घटना सुरू झाल्या असून, आता कुठे ३ ते ४ दिवसांपासून अवकाळी पावसाच्या आगमनाने वणव्याला थोडी उसंत मिळाली आहे.
२०२३-२४ मधील स्थिती (अधिकृत डेटा)
एकूण जळालेले क्षेत्र : १२,००३ हेक्टर (२०२२-२३ मध्ये १९,९९० हेक्टर होते).
आगीच्या घटना : सुमारे १६,००८ (एसएनपीपी-व्हीआयआयआरएस सेन्सरनुसार).
सर्वाधिक प्रभावित जिल्हे गडचिरोली (७,०४२ घटना), चंद्रपूर, अमरावती (मेळघाट)
आणि ठाणे.
सरासरी हानी : प्रति घटना २.१९ हेक्टर क्षेत्र बाधित.
अद्ययावत यंत्रणेची प्रतीक्षाच
वणवा नियंत्रणासाठी वन विभागाने राज्य शासनाकडे १०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. या निधीतून आधुनिक ब्लोअर्स, फायर प्रुफ जॅकेट्स आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम खरेदी करण्याचे नियोजन आहे. मात्र, सध्याच्या घडीला अनेक वनपरिक्षेत्रांत कर्मचाऱ्यांकडे साथी सुरक्षा साधनेही उपलब्ध नाहीत. डोंगरदऱ्यांत लागलेली आग विझवण्यासाठी केवळ मानवी कष्टावर विसंबून राहावे लागत असल्याने वणव्याची दाहकता वाढत आहे.
"केवळ झाडेच नव्हे, तर वणव्यामुळे वाघ, बिबट्या आणि अन्य तृणभक्षी प्राण्यांच्या अधिवासावर गदा येत आहे. मार्च ते मे या काळात लागणाऱ्या आर्गीमुळे जमिनीवरील पक्ष्यांची घरटी आणि अंडी नष्ट होत असल्याने जैवविविधतेचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत आहे."
- यादव तरटे पाटील, मानद वन्यजीवरक्षक