पश्चिम रेल्वेच्या एक्स्प्रेसचा वेग वाढणार; प्रवाशांचा अडीच तासांचा वेळ वाचणार; १ जानेवारीपासून नवीन वेळापत्रक झाले लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:11 IST2026-01-02T13:11:23+5:302026-01-02T13:11:58+5:30
याशिवाय २८ गाड्यांचा वेग वाढवण्यात येणार असून त्यामुळे दररोज एकूण १५७ मिनिटांची वेळ बचत होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पश्चिम रेल्वेच्या एक्स्प्रेसचा वेग वाढणार; प्रवाशांचा अडीच तासांचा वेळ वाचणार; १ जानेवारीपासून नवीन वेळापत्रक झाले लागू
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मेल-एक्स्प्रेस, मेमू आणि डेमू गाड्यांचे नवीन वेळापत्रक १ जानेवारीपासून अंमलात आले आहे. त्यामुळे मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या ४५ लांब पल्ल्याच्या गाड्या २ ते ११ मिनिटांनी लवकर गंतव्यस्थानी पोहोचणार आहेत. याशिवाय २८ गाड्यांचा वेग वाढवण्यात येणार असून त्यामुळे दररोज एकूण १५७ मिनिटांची वेळ बचत होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
काही गाड्यांची सरासरी गती वाढवण्यात आली असून त्याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. यामध्ये हरिद्वार-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेससाठी २४ मिनिटांची वेळ बचत होणार आहे, तर वांद्रे टर्मिनस-उदयपूर एक्सप्रेसच्या प्रवासकालात १० मिनिटांची कपात करण्यात आली आहे. तसेच अप दिशेतील सात गाड्या आता २ ते ५ मिनिटे लवकर सुटणार असून डाउन दिशेतील नऊ गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत ५ ते ३० मिनिटांपर्यंत बदल करण्यात आले आहेत. हे बदल प्रत्यक्ष परिचालन पद्धती तसेच प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लेटमार्कचे प्रमाण
कमी होण्यास मदत
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे डब्यांमध्ये सुधारणा, क्रॉस सेक्शन कमी करणे, विविध ठिकाणच्या वेगमर्यादा हटवणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
या सर्व सुधारणांमुळे प्रवाशांचा एकूण अडीच तासांपेक्षा अधिक वेळ वाचणार आहे. याशिवाय काही गाड्यांना नवे थांबे देण्यात आल्याने लेटमार्कचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
नवीन वेळापत्रकामुळे गाड्या अधिक वेळेवर, जलद आणि सोयीस्कर
होतील. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा थेट लाभ होईल, अशी अपेक्षा पश्चिम रेल्वेने व्यक्त
केली आहे.