तुम्ही भाजपासोबत जाणार होता का?, सुप्रिया सुळे विलिनीकरणावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या, म्हणाल्या, "बऱ्याच लोकांना गोष्टी माहितीये, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:44 IST2026-02-12T13:40:33+5:302026-02-12T13:44:56+5:30
Supriya Sule NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाचा मुद्दा अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विलिनीकरणाच्या चर्चेत खासदार सुप्रिया सुळे याही होत्या. याबद्दलच त्यांना विचारण्यात आले.

तुम्ही भाजपासोबत जाणार होता का?, सुप्रिया सुळे विलिनीकरणावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या, म्हणाल्या, "बऱ्याच लोकांना गोष्टी माहितीये, पण..."
Supriya Sule on NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षातील नेत्यांचे विलिनीकरणावर अजूनही एकमत झालेले नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाचा मुद्दा टाळताना दिसत आहेत, तर शरद पवारांच्या गटातील नेते ही चर्चा पूर्ण झाली होती, असे सांगत आहेत. या चर्चेत असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी विलिनीकरणाबद्दल सविस्तर भूमिका मांडली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. विलिनीकरण होणार होते, तर कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार होते आणि तुम्ही एनडीए (भाजपा)मध्ये सामील होणार होता का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला.
बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहितीये -सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. पण, अनेकवेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, माझं पोट किती मोठं आहे. आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्यामुळे काय कुणाबद्दल काय काढावं. भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं, ते दादाच्या (अजित पवार) आणि माझ्यामध्ये आहे. ते वास्तव आहे", असे उत्तर सुप्रिया सुळेंनी दिले.
'अजित पवारांसोबतच चर्चा झाली होती आणि अनेक लोकांना ती माहिती'
चर्चा पुढेही सुरू राहणार आहे का? या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या की, "माझा भाऊ जाऊन अजून १५ दिवसही झाले नाहीत. आम्हाला त्या धक्क्यातून बाहेर तर येऊ द्या. लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मी तुम्हाला आधीही म्हणाले की, आमची सगळी चर्चा दादासोबतच (अजित पवार) झाली होती. अनेक लोकांना ती माहितीही होती. पण, आता उणीदुणी कशाला काढायची? आता दादाच नाही राहिला. आम्ही त्या धक्क्यातून बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे आता ते विषय कशाला काढायचे", अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.
"...तर खूप गोष्टी झाल्या असत्या"
अजित पवार असते तर विलिनीकरणाची घोषणा झाली असती का? असाही प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्या म्हणाल्या, "दादा असता तर खूप अशा गोष्टी झाल्या असत्या. रेवतीच्या लग्नाची घोषणाही दादानीच केली असती. पण, दुर्दैव आहे की, दादा आज आपल्यात नाहीत. पण दादाची जी अपूर्ण स्वप्ने आहेत ती आम्ही पूर्ण करू."