जिल्ह्या-जिल्ह्यात पाणी वाॅर; जलपुनर्भरण आवश्यक, मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, विदर्भ पाणी परिषदेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 09:25 IST2025-06-08T09:25:02+5:302025-06-08T09:25:02+5:30
Devendra Fadnavis: पाण्यासाठी आता देशादेशांत किंवा राज्याराज्यांमध्येच नव्हे, तर जिल्ह्याजिल्ह्यांमध्येही वाॅर सुरू झाल्याचे चित्र आहे. नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये अशी पाणीयुद्धे पाहायला मिळतात. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर होय, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.

जिल्ह्या-जिल्ह्यात पाणी वाॅर; जलपुनर्भरण आवश्यक, मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, विदर्भ पाणी परिषदेला सुरुवात
नागपूर- पाण्यासाठी आता देशादेशांत किंवा राज्याराज्यांमध्येच नव्हे, तर जिल्ह्याजिल्ह्यांमध्येही वाॅर सुरू झाल्याचे चित्र आहे. नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये अशी पाणीयुद्धे पाहायला मिळतात. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर होय, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह धरमपेठ येथे विदर्भपाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. आ. डॉ. परिणय फुके, प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, वनामतीच्या संचालक डॉ. वसुमनी पंत, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक राजेश सोनटक्के, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर, राष्ट्रीय मृदा विज्ञान ब्युरो नागपूरचे संचालक डॉ. नितीन पाटील, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कृषी सहसंचालक डॉ. उमेश घाटगे प्रामुख्याने उपस्थित होते.
वैनगंगा-नळगंगासह पाच नदीजोड प्रकल्प
वैनगंगा-नळगंगा हा नदीजोड प्रकल्प विदर्भाचे चित्र बदलविणारा ठरणार आहे. यासोबतच राज्य सरकारने पाच नवीन नदीजोड प्रकल्प हाती घेतले आहेत, तसेच तापी जलपुनर्भरण योजनेबाबत मध्यप्रदेश सरकारसोबत करार करण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे २० ते २२ टीएमसी पाणी अमरावती विभागातील जिल्ह्यांना मिळणार आहे. या प्रकल्पातून महाराष्ट्र पाण्याबाबत
स्वयंपूर्ण कसा होईल, याचा संपूर्ण रोडमॅपच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितला.