“दोन्ही NCPचं विलीनीकरण अटळ, आता १०-११ दिवसांत…”; अजितदादांच्या निकटवर्तीयांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:21 IST2026-02-02T11:17:36+5:302026-02-02T11:21:10+5:30
NCP Party Merger News: अजित पवारांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील, असे म्हटले जात आहे.

“दोन्ही NCPचं विलीनीकरण अटळ, आता १०-११ दिवसांत…”; अजितदादांच्या निकटवर्तीयांचा मोठा दावा
NCP Party Merger News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. शरद पवार यांनीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर भाष्य केले. यानंतर आता दिवंगत अजित पवार यांचे खास निकटवर्तीय असलेल्यांनी याबाबत मोठा दावा केला.
राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना शरद पवार यांनी सांगितले की, चार महिन्यांपासून विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. विलीनीकरणाची घोषणा १२ तारखेला होणार होती. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे या प्रक्रियेला खंड पडला. या चर्चामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नव्हतो. अजितदादा, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे सातत्याने यात होते. दोन्ही पक्षांमध्ये एकत्र काम करण्याबाबत एकमत होते. दादांची इच्छा होती की, पक्ष एकत्र यावेत. ती इच्छा पूर्ण व्हावी, ही आमचीही इच्छा आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले. यानंतर आता विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि दिवंगत अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी मोठे विधान केले आहे.
अजित पवारांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल
पुढील दहा ते अकरा दिवस पवार कुटुंब या विषयावर बोलणार नाही पण दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होऊ शकते. २१ जानेवारीला अजित पवारांनी मला सांगितले होते की, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विलीनीकरण केलं पाहिजे. त्याबद्दल चर्चाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले होते. अजित पवारांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील, असे किरण गुजर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बारामतीत शरद पवार, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, पार्थ पवार, राजेंद्र पवार आणि रणजित पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर युगेंद्र पवार, पार्थ पवार आणि आमदार रोहित पवार गोविंदबागेतून बाहेर पडताना त्यांनी माध्यमांना कोणतीही माहिती दिली नव्हती, असे म्हटले जात आहे.