मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:54 IST2025-06-06T19:53:40+5:302025-06-06T19:54:25+5:30
जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीवर बोलले होते.

मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
नागपूर - अवघ्या महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून विविध चर्चा सुरू आहेत. त्यातच आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर जे महाराष्ट्राच्या मनात आहे, ते होईल असं सांगत सूचक विधान केले. त्यामुळे मनसे-उद्धवसेना एकत्र येण्याच्या चर्चेला बळ मिळाले. राज्यातील या मोठ्या घडामोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ शब्दातच भाष्य केले. ठाकरे बंधूंबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी माझा काय संबंध असं बोलून त्यावर फारसे बोलणे टाळले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार? माझा काय संबंध येतो. त्यामुळे ते आपापसात ठरवतील. कुणी साथ द्यायची, कुणी प्रतिसाद द्यायचा. कुणी द्यायचा नाही. त्यात पत्रकारच जास्त तारे तोडून राहिलेत. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, पण काही हरकत नाही. माध्यमांचे ते कामच आहे. आतातरी यावर प्रतिक्रिया देण्यासारखे काय आहे असं मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले. तसेच माझा राजकीय अनुभव मी वारंवार सांगत नसतो, मी तो योग्य वेळी सांगतो. त्यामुळे उचित वेळी मी सांगेन असंही त्यांनी म्हटलं.
Gadchiroli | On media reports of reconciliation between Uddhav Thackeray and Raj Thackeray, Maharashtra CM Devendra Fadnavis says, "Why should I react to what Uddhav Thackeray said? Raj Thackeray will react to it. What does it have to do with me? Uddhav Thackeray and Raj… pic.twitter.com/UZHOIiBDzn
— ANI (@ANI) June 6, 2025
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मनसेसोबतच्या युती चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना उत्तर दिले. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत. शिवसैनिकांच्या मनात कुठेच संभ्रम नाही. त्यांचे जे सैनिक संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. संदेश देण्यापेक्षा लवकरच जी काही बातमी द्यायची आहे ती देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मनसेची भूमिका काय?
दरम्यान, युतीच्या चर्चेबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो राज ठाकरे घेतील. ज्यावेळी ठोस गोष्ट होईल. प्रस्ताव येईल तेव्हा त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. आता जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले परंतु २०१४, २०१७ सालीही जनतेच्या मनात होते पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय हे जास्त महत्त्वाचे आहे. जनतेच्या मनातलं आम्हाला माहिती आहे. ते जर म्हणतायेत बातमी देऊ, तर त्या बातमीची आपण सगळे वाट पाहू अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानावर दिली.