मुंबई : ‘बोल बजरंग बली की जय’ असे म्हणत ढाक्कूमाकूमच्या तालावर थर रचत मुंबई, ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला मंगळवारी उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात झाली आहे. मात्र बहुतांशी ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे निर्देश पायदळी तुडवत दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बालगोविंदांच्या वयाची अट शिथिल करून ती १८ऐवजी १२ वर्षांपर्यंत कमी केली आहे. तसेच उंचीचीही मर्यादा ठेवलेली नाही. त्यामुळे यंदातरी उंच थरांची स्पर्धा रंगलेली पाहायला मिळणार आहे. ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, मुंबई आणि उपनगरांतील प्रत्येक गल्लीत दहीकाला उत्सवाची साजरा केला जात आहे. ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या दहीहंडीमध्ये स्पेनहून आलेल्या तरुणांनी सात थरांची सलामी देत उपस्थितांची वाहवा मिळवली. तर आ. प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने साधेपणाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.
घाटकोपरमध्ये राम कदम यांनी तर वरळीत सचिन आहीर यांनी दहीहंडीचे आयोजन केले आहे. या दहीहंडीमध्ये मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी हजेरी लावत आहे. सुप्रीम कोर्टाने सेफ्टी बेल्टचा वापर करणे, आयोजनस्थळी मऊ गाद्यांवर दहीहंडीसाठी थर लावणे बंधनकारक केले आहे. मात्र बहुतांशी ठिकाणी हे नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. ठाण्यातील खासदार राजन विचारे यांची दहीहंडी याला अपवाद ठरली आहे. विचारे यांनी आयोजनठिकाणी मॅटवर दहीहंडीचे आयोजन केले आहे. १२ वर्षांखालील बाल गोविंदाना थरावर चढण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही यावर पोलिस करडी नजर ठेवून आहेत.
मुंबईत ठिकठिकाणी १६ गोविंदा जखमी
मुंबईत आत्तापर्यंत ठिकठिकाणी १६ गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त आहे. नायर रुग्णालयात ३ तर सायन रुग्णालयात २ किरकोळ जखमी गोविंदांवर प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.