Robotic Boat: रिमोटच्या बोटींनी काढणार समुद्रातील कचरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:41 IST2025-06-20T13:39:49+5:302025-06-20T13:41:47+5:30
Mumbai News: नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मुंबई महापालिकेकडून ट्रॅश बुमचा प्रयोग केला जात आहे.

Robotic Boat: रिमोटच्या बोटींनी काढणार समुद्रातील कचरा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मुंबई महापालिकेकडून ट्रॅश बुमचा प्रयोग केला जात आहे. त्यानंतर आता पालिकेने समुद्रातील कचऱ्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यानुसार समुद्रातून वाहून येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बोटींचा वापर केला जाणार आहे. अशा दोन बोटींची खरेदी महापालिका करणार आहे.
जगातील काही देशांत समुद्रातील कचरा काढण्यास यांत्रिक बोटींचा वापर होतो. असाच प्रयोग आता मुंबईत होणार आहे. अलीकडे गेट वे ऑफ इंडिया व बधवार पार्क येथील समुद्रात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात प्लास्टिक, शेवाळ व तरंगत्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. या कचऱ्याच्या सफाईसाठी बोटींचा वापर केला जाणार आहे. पालिका खरेदी करणाऱ्या बोटींची किंमत पावणे तीन कोटी रुपये आहे. त्यासाठी राम इन्व्हायरो इन्फ्रा अँड एलएलपी कंपनीची निवड करण्यात आली आहे.
यांत्रिक वापराकडे कल
पालिकेने सफाईसाठी विविध प्रयोग सुरू केले आहेत. त्यानुसार महामार्गावरील सफाईसाठी यांत्रिक झाडूचा वापर केला जातो. तसेच नाल्यात यंदा ट्रॅश बूम बसवण्यात आले आहेत. त्यानंतर आता यांत्रिक बोटींचा वापर केला जात आहे.
कार्यक्षम पद्धतीची गरज
समुद्रातील तरंगत कचरा काढण्यासाठी एका कार्यक्षम पद्धतीची गरज होती. गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी रोज हजारो पर्यटक येत असतात. अनेकदा काही पर्यटक समुद्रातच कचरा टाकतात. तो कचरा तेथेच तरंगत राहतो. या कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ‘गेट वे’चे सौंदर्य धोक्यात आले आहे. अशीच परिस्थिती बधवार पार्क येथे आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी स्वच्छतेसाठी मानवरहित पद्धतीचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.