"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:08 IST2025-09-04T14:01:38+5:302025-09-04T14:08:57+5:30
Maratha OBC Reservation: सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील शासन आदेश काढला. यातून मराठा समाजाला काहीही मिळणार नसल्याचे विनोद पाटील म्हणाले. त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर त्यांनी आकडेवारीनेच उत्तर दिले.

"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
Manoj Jarange Vinod Patil: महाराष्ट्र सरकारने काढलेला हैदराबाद गॅझेटसंदर्भातील जीआर (शासन निर्णय) टाचणीभरही फायद्याचा किंवा उपयोगाचा नाही, असे म्हणत मराठाआरक्षणाचा लढा कोर्टात लढत असलेल्या विनोद पाटील यांनी यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. या टीकेला त्यांनी आकडेवारीतून उत्तर देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मनोज जरांगे यांनी पाच दिवस मुंबईतील आझाद मैदानात उपोषण केले. त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मंजूर करण्यास सरकारने तयार झाले. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णयही जारी केला. हा जीआर काही उपयोगाचा नाही, असे मराठाआरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हटलं होतं. त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर त्यांनी सविस्तर भाष्य केलं.
शिंदे समितीला नव्याने सापडलेल्या नोंदी किती? विनोद पाटलांचा सवाल
विनोद पाटील यांनी म्हटलं आहे की, "गोष्ट लक्षात घ्या... वारंवार सांगितले जात की, 58 लाख नोंदी सापडल्या, 58 लाख नोंदी सापडल्या. परंतु यातील विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील आजच्या आहेत का? मूळ प्रश्न हा की, शिंदे समितीला नव्याने सापडलेल्या नोंदी किती?", असे सवाल त्यांनी केले आहेत.
"बाकीच्या मराठ्यांचा विचार कोण करणार?"
"मराठवाड्यात फक्त 48 हजार नोंदी सापडल्याचं सरकारात नमूद आहे, त्यानुसार 2 लाख 39 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ही स्वागतार्ह बाब असून हा ही आपला विजयच आहे! पण मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", असा सवाल विनोद पाटील यांनी केला आहे.
"मी हे सगळं बोलत असताना मला शिवीगाळ करण्यात आली. पण जे कागदपत्रावर दिसतं आहे, त्याला काय म्हणणार? मी माझा लढा आजवर जसा लढलो, तसा कायम लढणार. लवकरच सक्षम वकिलांची फौज घेऊन न्यायालयात दाद मागणार आहे. समाजाचं खच्चीकरण होऊ देणार नाही. फसगत तर नाहीच नाही", अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
"त्या जीआरमध्ये काही मिळालं नाही"
"पुन्हा पुन्हा स्पष्ट सांगतो की, कालच्या GR मध्ये समाजाला नव्याने काहीही मिळालं नाही? कोर्टात जाऊ, सर्वांना मिळणार आरक्षण घेऊ! तुमच्या साथीने व आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने नक्कीच यश मिळेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.