...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:57 IST2025-06-09T06:57:27+5:302025-06-09T06:57:57+5:30
Devendra Fadnavis News: कारागृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात झालेल्या आरोपांबाबत पुरावे असतील आणि त्यात काही तथ्य आढळले, तर त्याची पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई देखील होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले

...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पुणे - कारागृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात झालेल्या आरोपांबाबत पुरावे असतील आणि त्यात काही तथ्य आढळले, तर त्याची पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई देखील होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले.आधी सुपेकर आणि नंतर गुप्ता यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर आणि माध्यमांत उमटत असलेल्या वृत्तांबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधींच्या लेखाचे उत्तर लेखानेच दिले
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीबाबत राहुल गांधी यांनी घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगाने आकडेवारीसह प्रमाण दिले आहे. याबाबत ‘लेखाचे उत्तर लेखाने दिले आहे, त्यामुळे आता तरी मला वाटते राहुल गांधी यापुढे अशा प्रकारचे बोलणे सोडतील’, असे मत फडणवीस यांनी महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
लाडक्या बहिणींसाठी निधी वळविलेला नाही
सामाजिक न्याय व मागासवर्ग विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळविल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, अर्थसंकल्पातील नियमानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात. त्याची तरतूदही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणूनच अजित पवार यांनी त्या हेडखाली तरतूद केली. एखाद्या कामाचा निधी तिसऱ्याच कामावर खर्च केला, तर त्याला निधी वळवला असे म्हटले जाते. अर्थसंकल्पात जर कायद्यानेच त्या विभागाकरिता किंवा घटकाकरिता जो पैसा खर्च होतो, तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल, तर ते चूक नाही. तो खर्च करणे सुद्धा चूक नाही. पैसा कुठेही वळवलेला नाही.