हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 07:39 IST2025-06-12T07:38:25+5:302025-06-12T07:39:07+5:30
Monsoon Update: मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होतील. या बदलानुसार, गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
मुंबई - मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होतील. या बदलानुसार, गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.मुंबईला आगमनावेळीच पावसाने दणका दिला. मुंबईची दाणादाण उडवून पाऊस बेपत्ता झाला. परिणामी, वाढत्या उकाड्याने मुंबईकर पुन्हा घामाने निथळत आहेत.
कोकणसह मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार
३० जूनपर्यंत पावसाची शक्यता असून त्यातील पहिल्या आठवड्यात कोकणसह मध्य महाराष्ट्रात, तर दुसऱ्या आठवड्यात मध्य भारतात चांगला पाऊस पडणार आहे. तिसऱ्या आठवड्यातही मध्य भारतातही चांगला पाऊस आहे. थोडक्यात, पुढील तीन आवठड्यांत देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, उणे ३२ पासून १०८ पर्यंतची मान्सूनची मजल मोठी असेल. जर का तसे होणार असेल तर देशात बऱ्याच ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थितीची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्याला कधी ऑरेंज अलर्ट?
पुढील तीन ते चार दिवस कोकण, विदर्भात धो-धो बरसणार
गुरुवार : अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली आणि कोल्हापूर
शुक्रवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
शनिवार : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
रविवार : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
देशात मोठा पाऊस पडणार; पूरसदृश स्थिती
हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, सध्या देशामध्ये पावसाचे प्रमाण ३२ टक्के कमी नोंदले गेले असताना हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जूनमधील पाऊस १०८ टक्के असण्याची शक्यता आहे. युरोपियन आणि हवामान विभागाचे मॉड्यूलनुसार पुढील तीन आठवडे देशात चांगल्या पावसाची शक्यता आहे.