‘दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले, आता...’, विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळे यांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:12 IST2026-02-17T13:01:55+5:302026-02-17T13:12:04+5:30
Supriya Sule News: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत लढवले जात असलेले तर्कवितर्क यांच्या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

‘दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबत गेले, आता...’, विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळे यांचं सूचक विधान
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या अपघाती निधनानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी घेतलेल्या प्रतिकूल भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या रखडली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिवंगत अजित पवार यांच्या चुलत भगिनी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक सूचक विधान केलं आहे. दादांनी घेतलेले निर्णय हे दादांसोबतच गेले, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत लढवले जात असलेले तर्कवितर्क यांच्या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता माझा भाऊच राहिला नाही. आता दादाच राहिला नाही, तर बाकीच्याला अर्थ काय? त्याचं दु:ख, दादाने घेतलेले निर्णय, दादाची स्वप्नं, सारं काही दादासोबतच गेली. आज माझा भाऊच राहिला नाही. त्यामुळे आज कोण काय म्हणतोय यामुळे काय फरक पडणार आहे, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
यावेळी नरेश अरोरा यांना राज्यसभेची खासदारकी देण्याबाबत प्रसारित झालेल्या वृत्तांबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याबाबत आज सकाळी अशी बातमी वृत्तपत्रात आली आहे, असे अनेक वृत्तवाहिन्यांनी सांगितलं. आता त्यांच्या पक्षाने कुणाला काय पद द्यायचं, हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.