श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:07 IST2025-11-28T06:06:24+5:302025-11-28T06:07:25+5:30
ऐन निवडणूक तोंडावर निधीला मंजुरी कशी मिळाली आदी सवाल भाजपच्या बॅनरमध्ये करण्यात आले. त्या परिसरातील पॅनलमधील भाजप इच्छुकांनी हा बॅनर लावत हे सवाल केले.

श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच विकास कामांवरून भाजप व शिंदेसेना या सत्ताधारी पक्षात श्रेयवादावरून बॅनर वॉर रंगले आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षे प्रलंबित असल्याने तो सत्ताधारी पक्षांमधील संघर्षाचा कळीचा मुद्दा ठरला आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यासाठी एमएमआरडीएने ३६ कोटींचा निधी मंजूर केल्याने त्याचे श्रेय शिंदेसेना लाटत असल्याची टीका भाजपने केली. शिंदेसेनेने आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नसून विकास कामांवर लक्ष केंद्रित करत असतो, असे सांगून खा. श्रीकांत शिंदे यांचे ते श्रेय असल्याचे आ. राजेश मोरे यांनी बॅनरद्वारे सांगितले होते.
शिंदेसेनेनी बॅनरद्वारे केलेल्या दाव्यावर भाजपने पलटवार करत २०१४ पासून विकास योद्ध्याने त्या पुलासाठी निधी का आणला नाही, असा सवाल करत प्रश्नांची सरबत्ती केली. कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे स्पीडब्रेकर कोण, उपरोक्त मार्गाला निधी न मिळवून देण्यासाठी जबाबदार कोण, २०१४ पासून आपलेच खासदार तरी हा मार्ग अर्धवट का राहिला आहे. या मार्गासाठी अडथळे कोणी आणले, ऐन निवडणूक तोंडावर निधीला मंजुरी कशी मिळाली आदी सवाल भाजपच्या बॅनरमध्ये करण्यात आले. त्या परिसरातील पॅनलमधील भाजप इच्छुकांनी हा बॅनर लावत हे सवाल केले.
शिंदेसेनेचे खा. बारणे म्हणतात, भाजपची टीका खपवून घेणार नाही
उरण नगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपचे आ. महेश बालदी यांनी उमेदवारांपासून नेत्यांपर्यंत टीका केली असावी. मात्र नेत्यांवर बोलण्याइतकी त्यांची ऐपत नाही. यापुढे नेत्यावर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही, असा गर्भित इशारा खा. श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी दिला. भाजपने महायुतीच्या मित्रपक्षांना डावलून आणि चर्चा न करताच स्वबळावरच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुखावलेल्या शिंदेसेनेच्या उमेदवारांनीही भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. यामुळे आ. बालदी यांनी केलेल्या टिकाटिप्पणी यामुळे संतप्त झालेल्या शिंदे सेनेच्या नेत्यांनी गुरुवारी उरण येथील सभेत संताप व्यक्त केला. उरणमध्ये शिवसेना वाढू नये, यासाठी आ. बालदी यांनी प्रयत्न केले. उरणच्या विकासासाठी सहा हजार कोटी आणले. मग केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या यांच्या उपस्थितीत झालेल्या उरण बायपासचा रस्ता २३ वर्षांनंतरही का झाला नाही, असा सवाल त्यांनी केला.
भाजपच्या ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देणार
शिंदेसेनेने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आ. बालदी यांनी शेवटच्या क्षणी गळ घातली. दोन जागा दिल्या नसल्याने बोलणी फिस्कटली. त्यामुळे पक्षांची ताकत दाखविण्यासाठीच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आ. बादली यांनी चार वर्षे फक्त त्रासच दिला. यापुढे उरणमध्ये भाजपच्या आरेला कारेने सडेतोड उत्तर देणार असल्याचे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी सांगितले. यावेळी शिंदेसेनेचे उपसचिव सचिन लोंढे यांनीही आ. बालदी यांच्या विरोधात टिकेची तोफ डागली.
सीएम-डीसीएमच्या सभांनंतर आला जोर
डहाणू नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असतानाच डहाणूत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ यांच्या प्रचारसभा झाल्यावर प्रचाराला वेग आला आहे. यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला असून, ते आपल्या उमेदवारांसह प्रचारासाठी इमारती आणि गल्लोबोलांत फिरत आहेत. पालघर जिल्ह्यातील तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे.