Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:14 IST2025-12-12T14:12:48+5:302025-12-12T14:14:19+5:30
Sindhudurg Kankavli Youth Couple: काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण-तरुणीने धरणात उडी मारून जीवन संपवल्याने खळबळ उडाली होती. हे तरुण तरुणी एकमेकांचे प्रियकर-प्रेयसी होते. तसेच आता या संदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासामधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर
काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण-तरुणीने धरणात उडी मारून जीवन संपवल्याने खळबळ उडाली होती. हे तरुण तरुणी एकमेकांचे प्रियकर-प्रेयसी होते. तसेच आता या संदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासामधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरवलेल्या मोबाईलमुळे खाजगी माहिती कुणाच्या तरी हाती लागून बदनामी होईल, या भीतीतून या दोघांनीही जीवन संपवल्याचे व्हॉट्सअॅप चॅट आणि पोलीस तपासामधून उघड झालं आहे.
कणकवली तालुक्यातील कलमठ कुंभारवाडी येथील सोहम चिंदरकर आणि कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील ईश्वरी राणे या तरुण तरुणीने तालुक्यातील तरंदळे येथील धरणात उडी मारून जीवन संपवले होते. दरम्यान, टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सोहम हा त्याचा हरवलेला मोबाईल शोधत होता, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याने आईच्या मोबाईलमधून व्हॉट्सअॅपवरून ईश्वरी हिच्यासोबत काही संभाषण केलं होतं. दरम्यान, या संभाषणामधून या प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी ही घटना घडली, त्याआधी सोहम याने ईश्वरी हिला आईच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवरून अनेक मेसेज केले होते. ‘माझा मोबाईल हरवला आहे. त्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ आहेत. हा मोबाईल कुणाच्या हाती लागला तर माझी खूप बदनामी होईल. त्यामुळे मी जीवन संपवत आहे, असे सोहमने ईश्वरी हिला केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे.
त्यानंतर ईश्वरी हिने सोहमची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्यातील चॅटिंगमधून दिसत आहे. पण जीवन संपवण्याच्या निर्णयाप्रत गेलेला सोहम हा ऐकण्याचा मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे तुझ्याशिवाय मी तरी एकटी कशी काय जगू? असा सवाल ईश्वरीने केला. तसेच आपण दोघेही एकत्र जीवन संपवूया, असे सोहमला सांगितले, अशी माहिती या दोघांत झालेल्या अखेरच्या चॅटिंगमधून समोर आली आहे.
दरम्यान, त्यानंतर या दोघांनीही जवळच असलेल्या तरंदळे येथील धरणाच्या परिसरात जाऊन तेथील पाण्यात उडी मारून जीवन संपवले. दोघेही घरातून बेपत्ता असल्याने शोधाशोध करत असलेल्या कुटुंबीयांना मेसेजच्या आधारावर जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांचे मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.