"बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही", गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 14:17 IST2022-05-30T12:56:46+5:302022-05-30T14:17:08+5:30
Gulabrao Patil : गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

"बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही", गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा
जळगाव : पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयात शिवसंपर्क अभियानाचा समारोप मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांच्यावर टीका करत परखड शब्दांत अनेक बाबींचा समाचार घेतला.
"काही लोकांनी श्री राम, श्री हनुमान या सारख्या देव देवतांचा आपल्या राजकीय स्वार्थापोटी पक्षात प्रवेश करुन घेतला असून भाजपवाल्यांनी तर शिवसेना हा पक्ष मूळ विचारापासून लांब गेल्याची बतावणी करत शिवसेनेला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे. माझ्या जिल्ह्यात माझ्या पक्षाचे पाच आमदार असल्याने राज्यात मनसेचा केवळ एकच आमदार आहे. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असून राज ठाकरे यांनी बाळा साहेबांसारखी भगवी शाल घातली तर त्यांनी बाळासाहेब होण्याचे स्वप्न पाहू नये. त्यांचे भोंगे कधी पासूनच बंद झाले आहेत", अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी असून खा. नवनीत राणा यांच्यावर नाव न घेता टीका करताना म्हणाले, "सध्या प्रत्येक टी. व्ही. चॅनलवर व वृत्तपत्रांवर एकच चेहरा दिसत असून नागरिकांनीही तो चेहरा किती वेळा पाहावा व मीडियानेही एखाद्याचे किती कौतुक करावे. याबाबतही विचार करण्यासारखी गोष्ट असल्याचे विधान केले. याचबरोबर, शिवसैनिकांनी राज्यात झालेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घेवून शिवसेनेची बदनामी करणाऱ्यांना जागेवरच उत्तर देण्याची धमक ठेवावी. केंद्र सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव गगणाला भिडले असून दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला आहे. वाढत्या महागाईपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे काही लोक शिवसेनेची बदनामी करत आहेत, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते तथा जिल्ह्याचे निरीक्षक लक्ष्मणराव वडले, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगर प्रमुख शरद तावडे, उपसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, डॉ. हर्षल माने, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, उप महापौर कुलभूषण पाटील, सुनिल पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, रमेश बाफना, उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, पद्मसिंग पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, प्रविण ब्राम्हणे शिवदास पाटील, रवि गीते आदींची उपस्थिती होती.