"काहींची इच्छा नसली तरी सुनेत्रा काकींनीच अध्यक्ष व्हावे"; रोहित पवारांचे विधान; NCP च्या नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:32 IST2026-02-10T13:31:52+5:302026-02-10T13:32:21+5:30
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्विकारल्यानंतर रोहित पवार यांनी पोस्ट करत अध्यक्षपदाचा मुद्दा छेडला आहे.

"काहींची इच्छा नसली तरी सुनेत्रा काकींनीच अध्यक्ष व्हावे"; रोहित पवारांचे विधान; NCP च्या नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी
Rohit Pawar on Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक पर्वाची आज मंत्रालयात सुरुवात झाली. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. २८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या पदावर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली. मात्र, या पदभार स्वीकारण्याच्या सोहळ्यापेक्षा रोहित पवार यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
मंत्रालयात भावूक वातावरण; पार्थ पवारांना अश्रू अनावर
३१ जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज विधीवत कामकाजाला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि आदिती तटकरे उपस्थित होते. ज्या खुर्चीत अजितदादा बसत असत, तिथे आज सुनेत्रा पवार यांना पाहताना पार्थ पवार आणि आदिती तटकरे यांना अश्रू अनावर झाले.
रोहित पवारांची पोस्ट आणि अध्यक्षपदाची गुगली
एककीडे सुनेत्रा पवार पदभार स्वीकारत असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रोहित पवार म्हणाले, "ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज मा. सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे पण सुनेत्राकाकी आहेत याचा आनंदही आहे. अजितदादांची उणीव कदापि भरुन काढता येणार नाही पण सुनेत्राकाकी या अजितदादांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील, याचा पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!"
परंतु, रोहित पवारांनी आपल्या पोस्टच्या शेवटी एक महत्त्वाचे विधान केले. "काकींनी आउपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं, ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळं तीही त्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं. रोहित पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदाचा नेमका वाद काय?
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पक्षात दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुनेत्रा पवार यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी, जेणेकरून अजितदादांचा वारसा आणि सहानुभूती पक्षाच्या पाठीशी राहील, असे एका गटाचे मत आहे. प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे अध्यक्षपद सोपवावे, अशी काही ज्येष्ठ नेत्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे.
सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा सुनेत्रा पवारांचा संकल्प
पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "दादांनी आयुष्यभर महाराष्ट्रासाठी जो ध्यास घेतला, तोच माझा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा मी सक्षमपणे पुढे नेईन. शेतकरी, महिला आणि तरुणांच्या अपेक्षांना न्याय देणे हीच माझी प्राथमिकता असेल."