अजित पवारांच्या विमान अपघातातील 'तो' पायलट जिवंत?; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:50 IST2026-02-28T12:49:17+5:302026-02-28T12:50:02+5:30
DGCA वर एफआयआर नोंदवून घेताना इतका संघर्ष करावा लागत आहे. शेवटपर्यंत पोलिसांनी हा एफआयर नोंदवून घेतला नाही. मग DGCA च्या रिपोर्टमधून हाती काय येणार आहे? असा सवाल अमोल मिटकरींनी केला.

अजित पवारांच्या विमान अपघातातील 'तो' पायलट जिवंत?; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
मुंबई - अजित पवारांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला. अद्याप तपासात कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचता आले नाही. इतके प्रबळ मुद्दे, पुरावे आहेत अजूनही लोकांना अपघातासाठी दिलेले हवामानाचे कारण पटत नाही. हा विमान अपघात सूनियोजितपणे घडवून आणला असावा त्यामुळे सीबीआयकडे हे प्रकरण सोपवले आहे. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरसोबतही छेडछाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शंकेला वाव आहे. इंधनात काही घटक असे समाविष्ट केले होते का ज्याने हवेत असताना इंजिन बंद पडले हादेखील वादाचा मुद्दा आहे. या विमानातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याचीही माहिती येतेय यासारखे खळबळजनक दावे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहेत.
विधिमंडळात पत्रकारांशी संवाद साधताना मिटकरी यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर मोठे दावे केले. अमोल मिटकरी म्हणाले की, अपघाताच्या काही तास आधी बारामती धावपट्टीवर आणि हँगर ठिकाणी काही व्यक्ती दिसल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. जे विमानतळाचे कर्मचारी नव्हते. त्यांना कुणाच्या सांगण्यावरून तिथे प्रवेश मिळाला याचा तपास राज्य सीआयडी करत आहे. एका महिन्यात ब्लॅक बॉक्स मिळाला. तो जळालेल्या अवस्थेत होता. त्यानंतर तो सुरक्षित असल्याचे सांगितले. अद्यापही या अपघातातील पायलट जिवंत असल्याचं कळतंय. सुमित कपूर कॅलिफोर्नियात असल्याची माहिती आहे. सुमित कपूर जर जिवंत असतील तर याचा अर्थ DGCA ने आधी ६ माणसे विमानात होती सांगितले, त्यानंतर ५ जणांचा मृतदेह सापडला असं सांगितले. याचा अर्थ त्या विमानात सुमित कपूर नव्हता. शांभवी पाठक विमान चालवत होती का..? असा प्रश्नही मिटकरींनी उपस्थित केला.
तसेच DGCA च्या अहवालात अजिबात काही उत्तरे मिळणार नाहीत. डीजीसीएकडून VSR कंपनी आणि त्यांच्या विमानावर ताशेरे ओढले आहेत. मग DGCA वर एफआयआर नोंदवून घेताना इतका संघर्ष करावा लागत आहे. शेवटपर्यंत पोलिसांनी हा एफआयर नोंदवून घेतला नाही. मग हाती काय येणार आहे?, माझ्या विवेकबुद्धीला जे पटते ते मी बोलतोय, मी जे बोलतोय ते चुकीचे नाही हे मला माहिती आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. आता इतर आमदार का बोलत नाही हे माहिती नाही. त्यांचीही जबाबदारी आहे पण स्वत: सुनेत्रा वहिनींनी नेत्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. रोहित पवारही मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. माझ्या पक्षातील आमदारांनीही वाटते, फक्त मी बोलतो, बाकीचे बोलत नाही असं मिटकरींनी स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, पवार कुटुंबातील एक व्यक्ती गेलाय त्यामुळे रोहित पवार बोलताहेत. या प्रकरणात कुणी चमकोगिरी करत नाही. जर रोहित पवार चमकोगिरी करताहेत असं कुणाला वाटत असेल तर सर्वांनी चमकोगिरी करून हा लढा लढला पाहिजे. अपघाताची चौकशी करावी यात चुकीचे काय? रोहित पवार अपघाताबाबत जे बोलताहेत त्याच्या बाजूने मी आहे. इतर राजकीय गोष्टींवर मी त्यांचे समर्थन करत नाही. अजितदादांसोबत काय घडले, अपघात झाला की घातपात झाला हे महाराष्ट्रासमोर आले पाहिजे अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली.
सुनेत्रा पवार अजितदादांची पोकळी भरून काढतील
पुढच्या ६ महिन्यात अजितदादांची जी पोकळी पक्षात जाणवते, ते भरून काढण्याचं सामर्थ्य सुनेत्रा वहिनींमध्ये आहे. त्या जिजाऊच्या लेक आहेत. त्यामुळे ५-६ महिने जाऊ द्या. एक पुरोगामी नेतृत्व महाराष्ट्राला भक्कम मिळेल. कारण त्या अजितदादांची सावली आणि आमच्या माऊली आहेत. त्यामुळे जरा काळ जाऊ द्या असा विश्वास आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला.