"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:28 IST2025-11-20T14:19:52+5:302025-11-20T14:28:35+5:30
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारीवरुन एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
Uddhav Thackeray On Eknath Shinde: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे. मित्रपक्षांमध्येच सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दिल्लीत जाऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. मंगळवारी झालेल्या नाराजी नाट्यानंतर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची ५० मिनिटांहून अधिक काळ भेट घेतली आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे तक्रार करताना थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव घेतल्याचे म्हटलं जात आहे. भाजप नेते जाणूनबुजून शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पैशांचे आमिष दाखवून आपल्या पक्षात सामील करून घेत आहेत. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील शिंदेसेनेचे अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवक फोडले जात असल्याचा आरोप शिंदेंनी केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा नाव न घेता ते दिल्लीला रडत गेले असल्याचे म्हटले.
"दिवट्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही. विरोधी पक्षांच्या आमदार खासदारांच्या फंडासाठी मुठी आवळल्या जातात हे वृत्तपत्रातून आपण वाचतो. आता तर त्यांच्याच मध्ये नसा आवळण्याचे सुरु झालं आहे. आजच पेपरमध्ये पाहिले एक कोणीतरी दिल्लीला गेलंय बाबा मला मारलं म्हणून. त्यांना त्या वयामध्ये एखादा चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती. शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना शालेय शिक्षण पूर्ण करता आलं नाही. चांगल्या लोकांना उत्तम शिक्षक आणि शिक्षण मिळालं नाही तर कसं तुरुंगात टाकलं जातं याचं उत्तम उदाहरण सोनम वांगचुक आहेत. ते काय म्हणतायत याच्याकडे दुर्लक्ष करुन त्यांना आतमध्ये टाकून दिलं आहे. निवडणुकीच्या दिवसात रेवडी वाटप सरसकट सुरुच आहे. दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करु ते उपकार असं सुरु आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महायुतीला धोका असल्याची एकनाथ शिंदेंना भीती
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना स्पष्ट केले की, महायुतीचे घटकपक्षच जर एकमेकांचे कार्यकर्ते फोडत असतील, तर आगामी निवडणुकीत याचा मोठा फटका बसेल. राज्यात महायुतीसाठी पोषक वातावरण असताना, काही नेते वैयक्तिक स्वार्थासाठी हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे विरोधकांना अनावश्यक फायदा होत आहे. शिंदेंनी युतीतील नेत्यांना सार्वजनिक वक्तव्ये करताना संयम ठेवण्याची आणि एकमेकांवर टीका करणे टाळण्याची गरज अमित शाह यांच्याकडे बोलून दाखवली. भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनाही ही बाब कळवली आहे, असे त्यांनी सांगितले.