“‘खासदार फुटणार’ याचा ठाकरे गटच सूत्रधार, अपयश पक्षांतर्गत नाराजीने...”; शिंदेसेनेचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:19 IST2026-04-10T15:18:38+5:302026-04-10T15:19:16+5:30
Shiv Sena Shinde Group MP Naresh Mhaske: अपयश, पक्षांतर्गत नाराजीवरुन लक्ष हटवण्यासाठी केविलवाणी धडपड असून, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करण्यात आली आहे.

“‘खासदार फुटणार’ याचा ठाकरे गटच सूत्रधार, अपयश पक्षांतर्गत नाराजीने...”; शिंदेसेनेचा पलटवार
Shiv Sena Shinde Group MP Naresh Mhaske: एकामागून एक निवडणुकांमध्ये झालेले दारुण पराभव, नेतृत्वाचे अपयश आणि पक्षांतर्गत उफाळून आलेल्या नाराजीवरुन लक्ष हटवण्यासाठी उबाठाचे नेते खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर, अशा खोट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्याची केविलवाणी धडपड करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांमध्ये झालेल्या बैठकीचे वृत्त खासदार म्हस्के यांनी फेटाळून लावले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेह भोजन आयोजित केले होते. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात. ही एक संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केलं तर पक्ष फुटणार, असे समजणे चुकीचे आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरसंदर्भातील बातम्या निराधार आहेत. ठाकरेंच्या खासदारांबाबत कोणत्याही विषयावर बैठक झालेली नाही, असे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही स्पष्ट केले आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले.
पक्षांतर्गत नाराजीवरुन लक्ष हटवण्यासाठी केविलवाणी धडपड
उद्धवसेनेत नेतृत्वावर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीत ठाकरे गट मुंबईबाहेर न गेल्याने पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षातील नाराजी असल्याने लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांना भेटणार, पक्ष फुटणार अशा खोट्या बातम्या ठाकरेंचेच नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत. ठाकरेंच्या खासदारांवर विश्वास नसल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याचे काम संजय राऊत करत आहेत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.
दरम्यान, संजय राऊतांच्या कटकारस्थानामुळेच ठाकरेंचा पक्ष मृतावस्थेत गेला. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. आदित्य ठाकरे राऊत यांना जाब विचारत असतील तर संजय राऊतांची त्यांच्याच पक्षातील अवस्था बिकट आहे. उद्धव ठाकरे रसातळाला गेले आहेत. याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष हा देशातला आघाडीचा प्रादेशिक पक्ष आहे. उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच अशा बातम्या पसरवत आहेत. पक्षांतर्गत कोणीतरी सावंत यांना बदनाम करत आहेत, म्हणून त्यांना वारंवार अग्निपरिक्षा द्यावी लागते, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.