“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:24 IST2025-11-28T16:23:50+5:302025-11-28T16:24:37+5:30
Eknath Shinde Ravindra Chavan Mahayuti: २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असे विधान रविंद्र चव्हाण यांनी केले होते

“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
Eknath Shinde Ravindra Chavan Mahayuti: राज्याच्या राजकारणात शिवसेना–भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले, शिवसेना–भाजप युती ही सत्ता किंवा परिस्थितीजन्य नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी विचारधारेवर ही युती घडवली आहे. त्यामुळे ही युती जुनी आणि मजबूत आहे. ही युती तुटणार नाही, सदैव कायम राहील. उपमुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली.
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच एक विधान केले होते. “युती किमान २ डिसेंबरपर्यंत तरी टिकायला हवी,” असे ते विधान होते. या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला होता. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वादानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, शिंदे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सुनावणी पूर्ण करत निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून युतीबाबत महत्त्वाचे विधान समोर आले.
निवडणुकांबद्दलच्या निर्णयावर शिंदे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नेमका काय आहे याचा अभ्यास करूनच अधिकृत भूमिकेची घोषणा करू. मात्र आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो. राज्यातील निवडणूक प्रक्रिया, ओबीसी आरक्षणाचा विषय आणि युतीतील अंतर्गत मतभेदाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर निकाल महत्त्वाचा आहे.